शिवस्वराज्य शेतकरी संघटनेचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित.
माजी आमदार रमेश कदम यांच्या शिष्टाईनंतर शेतकऱ्यांना न्यायाचे आश्वासन

चिपळूण ~ वार्ताहर
गुहागर तालुक्यातील अन्यायग्रस्त शेतकरी उमेश सुर्वे यांच्या समाईक मालकीच्या जमिनीत रेवस–रेड्डी पुलाच्या बांधकामासाठी अशोका बिटकॉइन या कंपनीकडून अनधिकृतपणे वर्कस्टेशनचे काम सुरू करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. संबंधित कंपनीने जमिनीसंदर्भात कोणतीही पूर्वपरवानगी न घेता थेट बांधकाम सुरू केले असून, यामध्ये शेतकरी सुर्वे यांच्या आंबा बागायतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दडप शाही ने अनधिकृत कार्यालयीन बांधकाम करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शेतकरी उमेश सुर्वे यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी, पोलीस अधीक्षक रत्नागिरी तसेच उपविभागीय अधिकारी चिपळूण यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र, संबंधित यंत्रणांकडून कोणतीही ठोस कार्यवाही अथवा सहकार्य न मिळाल्याने शिवस्वराज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंदार रहाटे व जमीन मालक उमेश सुर्वे यांनी दिनांक ९ जानेवारी रोजी चिपळूण प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
दुपारनंतर या प्रकरणी चिपळूणचे माजी आमदार रमेशभाई कदम यांच्या मध्यस्थीने प्रांताधिकारी चिपळूण यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान संपूर्ण विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले असून, शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही व त्यांना न्याय दिला जाईल, असे ठोस आश्वासन देण्यात आले.
या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी आपले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र, न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
सदर च्या उपोषण वेळी उपोषण कर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी शिवराज्य शेतकरी संघटनेचे संस्थापक आनंद भोजने, कार्यकर्ते आणि मित्र भाऊ काजरोळकर, पराग सुर्वे समीर सर्वे, समीर गडदे, सुदेश सुर्वे, पत्रकार सुजित सुर्वे सह ग्रामस्थ उपस्थित होते.















