संविधान समजून घेतल्यास वैश्विक नागरिक होता येईल – ॲड.श्रीया आवले
रत्नागिरी:- निलेश रहाटे
दिनांक :-12/1/2026
भारताचे संविधान समजून घेतले आणि संविधानिक वागणूक ठेवली तर आपण वैश्विक नागरिक (ग्लोबल सिटीझन) होऊ शकतो असे मत ॲड.श्रीया आवले यांनी व्यक्त केले. नॅशनल युथ डे साजरा करण्यासाठी एसपीएम इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पुण्यातील आय एल एस विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यावर पुणे विद्यापीठातून प्राविण्यासह ‘भारतीय संविधान’ विषयात मास्टर्स केलेल्या श्रीया आवले यांनी आज महाराष्ट्रातील एक महत्वाच्या वकील म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे व शाळेच्या माजी विद्यार्थिनी म्हणून त्यांचा आम्हाला अभिमान आहे त्याबद्दल शाळेतर्फे त्यांचा विशेष सत्कार ठेवण्यात आला असे शाळेच्या मुख्यध्यापक आरती खाडिलकर म्हणाल्या. यावेळी शाळेतील विद्यार्थी, पालक आणि चिपळूण मधील काही वकील सुद्धा उपस्थित होते.
विविध न्यायालयात चालविलेल्या केसेस मधील उदाहरणे देत ॲड. श्रीया यांनी सांगितले की, सोशल मीडियाचा वापर अत्यंत सजगपणे केला पाहिजे. आपण कोणत्याही धर्मांध, जातीय तेढ वाढविणाऱ्या पोस्ट फॉरवर्ड करणे अविचारीपणाचे ठरू शकते. दुर्दैवाने आज काहीजण अभिव्यक्ती स्वातंत्र्य न मानणारे व झुंडींद्वारे दहशत निर्माण करणारे वाढले आहेत. अश्यावेळी संवादावर भर ठेवण्याकडे नवीन पिढीने भर ठेवावा. आपण पर्यावरणस्नेही जीवन जगायला शिकणे आता आवश्यक झाले आहे. आपण पर्यावरण रक्षणासाठी काम करतो म्हणजे निसर्ग व पर्यावरणावर उपकार करीत नाहीये तर मानव-प्राण्यांचे जीवन पर्यावरणावर अवलंबून असल्याने आपण आपल्यासाठी पर्यावरण रक्षण करणे महत्वाचे आहे. संविधानात सांगितलेली धार्मिक बहुविविधता स्वीकारली तर आपल्यात विविधतेबाबत सहनशीलता टिकून राहील. समाजात शांतता असेल तरच शाश्वत विकासाच्या दिशेने आपण जाऊ नाहीतर आपसातील वादविवाद व भांडणात अडकलेल्यांचा देश हीच आपली परिस्थिती राहील अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुष्कर जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन स्नेहल जोशी यांनी केले















