बाबासाहेबांच्या विचारांचा प्रत्यय: अपंग आणि मूक-बधिर मतदार मतदान केंद्रावर
रत्नागिरी खंडाळा :- निलेश रहाटे
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक नागरिकाला दिलेल्या मतदानाच्या मूलभूत हक्काचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या प्रेरणादायी घटना वाटद परटवणे येथे दिसली . येथील एका अपंग मतदारासह एका मूक-बधिर युवतीनेही सर्व अडचणींवर मात करत मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला.
चालता न येण्याची अडचण असल्याने संबंधित अपंग मतदारास मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी उपस्थित नागरिक व पत्रकार निलेश रहाटे यांच्याकडून आवश्यक सहकार्य करण्यात आले. तसेच मूक-बधिर युवतीनेही उपलब्ध सुविधांचा लाभ घेत शांतपणे मतदान प्रक्रिया पूर्ण केली.
भारतीय संविधान अपंग, मूक-बधिर तसेच सर्व नागरिकांना समानतेने मतदानाचा अधिकार प्रदान करते. अपंगत्व किंवा शारीरिक मर्यादा लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अडथळा ठरत नाही, हे या दोन्ही घटनांमधून स्पष्ट झाले आहे. अनेक सक्षम मतदार मतदानापासून दूर राहतात, अशा परिस्थितीत या मतदारांनी बजावलेले नागरिकत्वाचे कर्तव्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
ही घटना संविधानिक मूल्यांची आठवण करून देणारी असून, “मतदान हा केवळ हक्क नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार लोकशाही टिकवण्याचे नागरिकांचे कर्तव्य आहे,” हा महत्त्वाचा संदेश देणारी आहे.













