वाटदच्या सुपुत्राला राज्यस्तरीय सन्मान : संदीप जाधव यांना ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ पुरस्कार जाहीर
रत्नागिरी प्रतिनिधी : निलेश रहाटे
रत्नागिरी तालुक्यातील वाटद गावचे सुपुत्र मा. संदीप सोनुजी जाधव यांना नालंदा ऑर्गनायजेशन, महाराष्ट्र शासन संलग्न सारंग सोसायटी, सहकार नगर, पुणे यांच्या वतीने “आदर्श ग्रामपंचायत अधिकारी” हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नालंदा ऑर्गनायजेशनच्या माध्यमातून आयोजित ग्राम समृद्धी सन्मान सोहळा २०२६ हा कार्यक्रम दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे पार पडणार असून, प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मा. संदीप जाधव यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
मा. संदीप जाधव सध्या ग्रामपंचायत जांभारी, ता. जि. रत्नागिरी येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असून अभ्यासू, कर्तव्यनिष्ठ व कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिक, उद्योजक व व्यापाऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची प्रभावी माहिती देऊन त्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध शासकीय उपक्रम राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. देशभक्तीपर व राष्ट्रीय महामानवांच्या जीवनावर आधारित क्रांतिकारक गीते सादर करण्याचा त्यांचा छंद असून सामाजिक क्षेत्रात बौद्धाचार्य, धम्म संस्कार समितीचे सदस्य, धम्मक्रांती कला मंचाचे सहसचिव तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत.
त्यांच्या या सर्वांगीण कार्याची दखल घेत “आदर्श ग्रामपंचायत अधिकारी” पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने वाटदसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.














