जयगड–तवसाळ पुलासाठी घरावर बुलडोझर; तवसाळकर कुटुंबाचा आरोप – पूर्वसूचना न देता कारवाई, न्यायासाठी लढा सुरू
मुंबई–गोवा महामार्ग प्रकल्पातील कारवाईवर ग्रामस्थांचा संताप; जमीन अधिग्रहण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
गुहागर (सुजित सुर्वे प्रतिनिधी :
मुंबईसारख्या धकाधकीच्या शहरी जीवनाला कंटाळून निवृत्तीनंतर आपल्या मूळ गावी शांततेत आयुष्य घालवावे, निसर्गाच्या सान्निध्यात आणि आप्तेष्टांच्या सहवासात दिवस काढावेत, अशी स्वप्ने अनेक कोकणी चाकरमानी पाहत असतात. गावात येणारे सण, शिमगोत्सवाच्या पालख्या, नातेवाईकांची भेट आणि गावची माती – या सर्व गोष्टींचा आनंद घ्यावा, हीच भावना मनात ठेवून अनेकजण आपली आयुष्यभराची कमाई गावात घर बांधण्यासाठी खर्च करतात.

आणि त्याचं घर बुलडोझर ने त्याचे समोर पाडलं गेलं….
अशीच एक स्वप्ने घेऊन शरद तवसाळकर यांनी आपल्या पत्नीच्या इच्छेनुसार आयुष्यभराची बचत खर्च करून तवसाळ येथे छोटेसे घर बांधले होते. मात्र हेच घर त्यांच्या डोळ्यासमोर बुलडोझरने पाडले गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रकल्प असलेल्या मुंबई–गोवा महामार्गाच्या कामासाठी जयगड–तवसाळ (रेवस रेड्डी) पूल उभारण्यात येत आहे. या पुलाच्या कामाची अंमलबजावणी अशोका बिल्डकॉन कंपनी करत असून त्या कामासाठी अडथळा ठरत असल्याचे कारण देत दिनांक ७ मार्च रोजी तवसाळकर यांचे घर बुलडोझरने पाडण्यात आले.
या कारवाईवेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तवसाळकर कुटुंबियांनी सांगितले की, घर पाडण्यापूर्वी ग्रामपंचायत किंवा संबंधित प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना किंवा मोबाईलद्वारे संपर्क करण्यात आला नव्हता.
तवसाळकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की,
“ऐन उन्हाळ्यात आमच्या घरासमोरील पिण्याच्या पाण्याची विहीरही बुजवण्यात आली. त्यामुळे आमच्या कुटुंबाला पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. आम्हाला पाण्यावाचून त्रास द्यायचा हेतू तर नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.”
या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबाची मानसिक, शारीरिक आणि आर्थिक अवस्था चिंताजनक झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच योग्य त्या कायदेशीर मार्गाने या कारवाईविरोधात तक्रार करून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकल्पामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली असून काजू, आंबा आणि नारळाची झाडे तोडल्याचा आरोपही स्थानिक शेतकरी करत आहेत. कंपनी, काही अधिकारी आणि स्थानिक पुढाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा संशयही ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
लोकांची घरं झाडे बागायती नष्ट करून कोकणचा विकास करणारा प्रकल्प…..?
यामुळे प्रभावित शेतकरी आणि जमीनमालकांमध्ये असंतोष वाढला असून कायदेशीर मार्गाने आंदोलन उभारून न्याय मिळवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या घटनेने मानवी हक्क यांची पायमल्ली करण्यात आली असाही सूर लोकभावनेतून येतोय.













