दादर-रत्नागिरी पॅसेंजर तातडीने सुरू करा; अन्यथा ट्रेन रोखण्याचा मनसेचा इशारा
१५–२० दिवसांत निर्णय न झाल्यास उत्तर भारतातील एक्सप्रेस गाड्यांवर आंदोलनाचा इशारा; प्रवाशांच्या गैरसोयीवर मनसे आक्रमक
नवीमुंबई (मंगेश जाधव): कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. ही मागणी येत्या १५ ते २० दिवसांत मान्य न झाल्यास उत्तर प्रदेश व बिहारकडे जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या रोखण्याचा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
सध्या ही पॅसेंजर ट्रेन दादरऐवजी फक्त दिवा स्थानकापर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने कोणतेही ठोस कारण न देता हा निर्णय घेतल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यामुळे कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
मनसे नेते नितीन सरदेसाई यांनीही या मुद्द्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रवाशांना दिवा स्थानकापर्यंत जाऊन ट्रेन पकडावी लागत असल्याने त्यांचा वेळ व त्रास दोन्ही वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. हा प्रश्न लवकर न सुटल्यास “मनसे स्टाईल” आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
कोकण रेल्वेसाठी स्थानिकांनी जमीन दिली असून, आज त्याच कोकणवासीयांची गैरसोय होत असल्याची खंत मनसेने व्यक्त केली आहे. हा प्रश्न तातडीने सोडवून दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.















