रत्नागिरीत ‘खरेदीदार-विक्रेता संमेलन’ उत्साहात; ५.१३ कोटींचे करार
रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकरी, प्रक्रियादार आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभाग व ‘आत्मा’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन व फणस प्रक्रिया कार्यशाळा २०२६’ उत्साहात पार पडली. या संमेलनात तब्बल ५.१३ कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) करण्यात आले, जे जिल्ह्याच्या कृषी व्यापारासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे व उपाध्यक्ष विलास चाळके यांच्या हस्ते झाले. यावेळी विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
५१० प्रकल्पांची उभारणी
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी सांगितले की, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत जिल्ह्यात ५१० प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामुळे रोजगारनिर्मितीबरोबरच कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धनही वाढले आहे.
फणस प्रक्रियेवर विशेष भर
कोकणातील प्रमुख फळ असलेल्या फणसाचे नुकसान टाळण्यासाठी आणि त्यातून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी या कार्यशाळेत प्रक्रिया तंत्रज्ञानावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी या संमेलनाला नवउद्योजकांसाठी “संजीवनी” असे संबोधले. तर उपाध्यक्ष विलास चाळके यांनी रत्नागिरीच्या फलोत्पादन क्षमतेचा उल्लेख करून अशा उपक्रमांमुळे जागतिक बाजारपेठेचे दरवाजे उघडतील, असे मत व्यक्त केले.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन व सन्मान
कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, संसाधन व्यक्ती व बँकांचा सन्मान करण्यात आला. तसेच ‘अपेडा’ (APEDA) मार्फत निर्यातीतील संधी, आव्हाने आणि प्रोत्साहन योजनांबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
विक्रमी करार
संमेलनाच्या अंतिम सत्रात खरेदीदार व विक्रेता यांच्यात थेट संवाद होऊन ५.१३ कोटी रुपयांचे करार झाले. या उपक्रमाला ५०० हून अधिक शेतकरी, प्रक्रियादार आणि खरेदीदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
👉 या संमेलनामुळे नजीकच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यातून कृषी उत्पादनांची निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















