डोंबिवलीत शब्दसाज साहित्य संस्थेचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साहात
डोंबिवली (गुरुदत्त वाकदेकर): डोंबिवली पूर्व येथे रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी शब्दसाज साहित्य संस्थेतर्फे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साही वातावरणात पार पडले. वृषाली जोशी, मानसी आंब्रे आणि वैभव बटावले यांनी आयोजित केलेल्या या संमेलनात राज्यभरातून अनेक साहित्यिक सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सुनीता परब आणि त्यांच्या चमूने सादर केलेल्या स्वरचित स्वागत गीताने झाली. योगिता खानविलकर आणि संगीता कासले यांनी साकारलेल्या सुबक व आकर्षक रांगोळीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ज्येष्ठ साहित्यिक वाणी वेणूमाधव केरकलमट्टी यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध लेखक रमेश पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी काव्यगंध प्रकाशनाच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये ‘शब्दसाज विशेषांक’ (प्रातिनिधिक काव्यसंग्रह), ‘शब्दांकुर’ (विनोद डंबे लिखित काव्यसंग्रह) आणि ‘काव्यामृत’ (रघुनाथ भिसे लिखित काव्यसंग्रह) यांचा समावेश होता. या सोहळ्यात विविध कवींनी सादर केलेल्या कवितांनी सभागृह भारावून गेले.
संमेलनातील विशेष आकर्षण ठरलेले ‘सखाराम बाइंडर’ या विजय तेंडुलकर यांच्या लघुनाटिकेचे काही प्रसंग संतोष जाधव आणि मानसी आंब्रे यांनी प्रभावी अभिनयातून सादर केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अविनाश ढळे, योगिता खानविलकर, प्रियांका कुटे, सुनीता परब, विद्या थोरात, इंदिरा शिंगणे, रघुनाथ भिसे, विनोद डंबे, संगीता कासले आणि संतोष जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्वांना ‘मानाचे शिलेदार’ म्हणून गौरविण्यात आले.
साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल संतोष जाधव, स्मिता शिंदे, जीवा मोरे, विवेक जोशी आणि विकास पाटील यांना ‘साहित्य रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१० फेब्रुवारी २०२६ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शब्दसाज साहित्य संस्थेतर्फे यूट्यूबवर स्वरचित अभिवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सुनीता परब यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर दीपाली साबळे धांडे यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. या दोघींनाही संमेलनात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. शब्दसाज साहित्य संस्थेचे हे तिसरे साहित्य संमेलन साहित्यप्रेमींसाठी प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरले.















