सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन
, रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६:
डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत असलेले ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी’ येथे दिनांक ११ मे रोजी कोकण कृषी विद्यापीठाचे जनक आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉ. बाळासाहेब सावंत (८ जून १९०८ – ११ मे १९९२) यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला.
डॉ. बाळासाहेब सावंत हे महाराष्ट्राचे माजी कार्यवाह मुख्यमंत्री तसेच कोकणातील कृषी, शिक्षण व ग्रामीण विकासासाठी कार्य करणारे दूरदृष्टीचे नेते होते. त्यांच्या स्मरणार्थ कोकण कृषी विद्यापीठाला “डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ” हे नाव देण्यात आले आहे.
यावेळी केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. सावंत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी संशोधन केंद्र प्रमुख डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (विभाग प्रमुख) यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार प्रदान करून आणि उपस्थितांकडून अभिवादन करण्यात आले. यावेळी संशोधन केंद्रातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. डॉ. केतन चौधरी यांनी डॉ. बाळासाहेब सावंत यांनी कोकणातील शेतकरी, मत्स्यव्यावसायिक आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी केलेले कार्य याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कृषी, मत्स्यव्यवसाय, बागायती आणि ग्रामीण विकास क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. यावेळी विशेष अतिथी म्हणून, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाचे माजी संशोधन संचालक तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे माजी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. प्रकाश शिनगारे, मत्स्यमहाविद्यालय, शिरगाव चे माजी सहयोगी अधिष्ठाता तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे माजी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. सुरेश नाईक तसेच तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे संशोधन अधिकारी डॉ. शशिकांत मेश्राम हे सुद्धा उपस्थित होते. सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव रत्नागिरी येथील डॉ. आसिफ पागरकर, प्राध्यापक, डॉ. मनोज घुघुस्कर, प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम, सहाय्यक संशोधन अधिकारी, श्रीम. वर्षा सदावर्ते, अपूर्वा सावंत तसेच जाई साळवी या उपस्थित होत्या.
डॉ. बाळासाहेब सावंत हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते एक द्रष्टे समाजसुधारक होते. सन १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांनी १९६० ते १९७२ या काळात महाराष्ट्र सरकारमध्ये विविध महत्त्वाची मंत्रिपदे भूषविली. १८ मे १९७२ रोजी त्यांच्या प्रयत्नांतून कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. त्यांच्या निधनानंतर १२ फेब्रुवारी २००१ रोजी विद्यापीठाचे नामकरण ‘डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ’ असे करण्यात आले. या संशोधन केंद्रांच्या तसेच विद्यापीठाच्या माध्यमातून डॉ. बाळासाहेब सावंतांनी पाहिलेले ‘सुजलाम सुफलाम कोकण’चे स्वप्न पूर्ण करण्याचे काम आजही सुरू आहे.

















