जांभारीत भीषण स्फोट; जंगलात सापडले तब्बल २५ जिवंत गावठी बॉम्ब

रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे
रत्नागिरी तालुका मधील जांभारी परिसरात मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. जंगल परिसरात लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या हातात संशयास्पद वस्तूचा अचानक स्फोट झाला. या भीषण स्फोटात महिलेचा हात गंभीर जखमी झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेश्मा प्रमोद सुर्वे (वय ४५, रा. जांभारी फाटा) या सकाळच्या सुमारास जंगलात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना जमिनीवर पडलेली संशयास्पद वस्तू दिसली. उत्सुकतेपोटी त्यांनी ती हातात उचलताच अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका तीव्र होता की त्यांच्या हाताची बोटे तुटून गंभीर भाजल्या गेल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी अवस्थेत असलेल्या महिलेला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस आणि बॉम्बशोधक पथक दाखल झाले असता परिसरातून आणखी २० ते २५ जिवंत गावठी बॉम्ब आढळून आले. त्यामुळे हा स्फोट नेमका कशासाठी आणि कोणी घडवून आणला, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
संपूर्ण परिसर पोलिसांनी सील केला असून बॉम्बशोधक पथक, श्वानपथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी तपास करत आहेत. या घटनेमुळे जांभारी परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
फोटो व्हायरल सोशल मिडिया. साभार.















