गेटवे परिसरातील डिझेल बोटी आता होणार इलेक्ट्रिक; मुंबई बँकेकडून विशेष कर्ज योजना
नितेश राणे आणि प्रवीण दरेकर यांच्या बैठकीत निर्णय; पहिल्या टप्प्यात २५ लाभार्थींना प्राधान्य
मुंबई : पंतप्रधान Narendra Modi यांच्या हरित पर्यावरण आणि इंधन बचतीच्या संकल्पनेला प्रतिसाद देत राज्य सरकारने मुंबईतील Gateway of India परिसरातील डिझेलवर चालणाऱ्या बोटी टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बोटींमध्ये रूपांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या उपक्रमासाठी बोट मालकांना आर्थिक सहाय्य तसेच कमी व्याजदरातील विशेष कर्ज योजना उपलब्ध करून देण्यासाठी Mumbai Bank मार्फत विशेष धोरण तयार करण्यात येणार आहे. यासंदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री Nitesh Rane आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार Pravin Darekar यांच्यात बैठक पार पडली.
पहिल्या टप्प्यात २५ लाभार्थींना प्राधान्य देण्यात येणार असून त्यापैकी पहिल्या ५ जणांना प्रायोगिक तत्त्वावर इलेक्ट्रिक बोटी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
सध्या गेटवे परिसरात ९७ लायसन्सधारक लाकडी बोटी कार्यरत असून डिझेलवरील वाढत्या खर्चामुळे बोट मालकांना दरमहा सुमारे १ लाख रुपयांपर्यंत इंधन खर्च करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासी व मच्छिमारी बोटींचे इलेक्ट्रिक बोटींमध्ये रूपांतर करण्यासाठी विशेष योजना राबविण्याची गरज असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
इलेक्ट्रिक बोटींची किंमत अंदाजे २.५ कोटी ते ६ कोटी रुपयांपर्यंत असल्याने मत्स्य संस्था, खासगी बोट मालक, वैयक्तिक लाभार्थी आणि असोसिएशन यांच्यासाठी विशेष कर्ज योजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबईतील कोळी बांधवांचे आधुनिकीकरण, इंधन बचत, हरित पर्यावरण संवर्धन आणि आधुनिक जलपर्यटनाला चालना देणारा हा उपक्रम मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.















