पुणे विषारी दारू प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर घणाघात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खुले पत्र
पुणे : पुण्यात घडलेल्या कथित विषारी दारू प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार Sanjay Raut यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या खुल्या पत्रातून राऊत यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, “पुण्यातील विषारी दारुकांड हे गृह खात्याला लागलेले आणखी एक लांच्छन आहे. या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. हा प्रकार सदोष मनुष्यवधाचा आहे, मात्र सरकारला याचे गांभीर्य वाटत नाही.”
यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका करताना पोलिस यंत्रणेला अन्य विषयांमध्ये गुंतवून ठेवले जात असल्याचा आरोप केला. “सरकारचे लोक पोलिसांना लव्ह जिहाद, हिंदू-मुस्लिम वाद, ईदच्या कुरबान्या अशा विषयांत गुंतवून ठेवतात आणि मग अशा सामूहिक दुर्घटना घडतात,” असेही त्यांनी नमूद केले.
तसेच, “राज्यात सर्वच स्तरांवर कायद्याचे राज्य संपले आहे,” असा आरोप करत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणीही राऊत यांनी केली आहे.
दारू विक्रेत्यांवर कारवाईच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारला टोला लगावत, “विषारी दारू विक्रेत्यांना तुमच्या प्रसिद्ध वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करा आणि पक्षवाढीसाठी वापरा,” अशी उपरोधिक टिप्पणी केली.
दरम्यान, पुण्यातील या प्रकरणामुळे राज्यातील बेकायदा दारू विक्री, पोलिस प्रशासनाची कार्यपद्धती आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.














