घाटीवळे ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार; चौकशी अहवाल तब्बल १६ महिन्यांनी, तोही कथित खोट्या कागदपत्रांसह
*रत्नागिरी (प्रतिनिधी): निलेश रहाटे
घाटीवळे ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत माहिती अधिकार कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या तक्रारी व चौकशी प्रकरणात प्रशासनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित प्रकरणाचा चौकशी अहवाल तब्बल १६ महिन्यांच्या विलंबानंतर देण्यात आला असून, अहवालात दिशाभूल करणारी माहिती तसेच कथित खोटी कागदपत्रे जोडण्यात आल्याचा आरोप RTI कार्यकर्ते नंदकुमार डोळस व जन आंदोलन मंच घाटीवळे हयांनी केला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते नंदकुमार डोळस व जन आंदोलन मंच घाटीवळे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित प्रकरणात वेळेत चौकशी पूर्ण करून अहवाल देणे अपेक्षित असताना ग्रामपंचायत प्रशासनाने दीर्घकाळ दिरंगाई केली. अखेर सादर करण्यात आलेल्या अहवालात वस्तुस्थिती लपविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
तसेच काही कागदपत्रांच्या सत्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, गावाच्या विकासासाठी पारदर्शक व जबाबदार प्रशासन आवश्यक असते. मात्र जर ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडून अशा प्रकारे विलंब, दिशाभूल व कथित खोटी कागदपत्रे सादर केली जात असतील तर गावाच्या विकास प्रक्रियेला मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच चौकशी अहवालातील सर्व कागदपत्रांची स्वतंत्र पडताळणी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणीही जोर धरत आहे.
आता या गंभीर आरोपांबाबत ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका काय असणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.














