महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध
विरार – संदीप शेमणकर
केंद्र व राज्य सरकारच्या महागाई, तसेच पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या धोरणांविरोधात शिवसेनेच्या वतीने विरार शहरात तीव्र निदर्शने करण्यात आली. विरार रेल्वे स्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर चूल मांडून, चाबकाचे आसूड ओढत आणि मेलोडी चॉकलेट वाटप करून शिवसैनिकांनी सरकारच्या कारभाराचा निषेध नोंदवला.
दिल्लीतील जंतरमंतर येथे लाखो तरुणांनी आंदोलनाची ठिणगी पेटविल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार विरार शहरप्रमुख उदय अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी पालघर जिल्हाप्रमुख प्रथमेश राऊत आणि जिल्हा सचिव आनंद चोरगे यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. महिला शहरसंघटक सौ. शिलाताई लष्करे, उपशहरसंघटक सौ. रोशनी जाधव, विभागसंघटक जयश्री चव्हाण, सौ. प्राजक्ता जांभळे, सुनीता सोनजे, साक्षी जाधव, रजनी कोठावळे यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर चूल मांडून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित कसे विस्कळीत झाले आहे, याकडे लक्ष वेधले.
तसेच ॲड. गिरीश दिवाणजी, शहर कार्यालय प्रमुख सुनील चव्हाण, उपशहर समन्वयक रमेश गुरव, सचिव राहुल धुरी, उपशहरप्रमुख जितेंद्र खाडे, विभागप्रमुख अजय पिंपळे, शाखाप्रमुख दिनेश आदवडे आणि शिवराम तळेकर यांनी चाबकाचे आसूड ओढत सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.
या आंदोलनात महेश दीक्षित, रोहित देव, रवींद्र वाळुंज, प्रदीप साने, विनायक सकपाळ, शशी कदम, तुकाराम भुवड, गणेश धावडे, सुनील कुटवड, रहिस शेख, प्रितम रावराणे, चंद्रकांत सावंत, जीवराज कोकितकर, विनायक पाटील, अल्ताफ अन्सारी, सुनीता मुळे, मीनाक्षी कदम, प्रिया मांडवकर, भावेश बाईत, मंगल गायकवाड, पूनम दुंडे, रोहित कदम, अरविंद दामुस्टे, मंगेश हातानकर आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असल्याचा आरोप केला. तसेच महागाईच्या प्रश्नावर झोपेचे सोंग घेत असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनामुळे परिसरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले होते.















