*रत्नागिरी नगर परिषदेत सफाई कामगारांच्या वेतनप्रश्नी हालचाल; पालकमंत्री उदय सामंत यांच्या भूमिकेचे स्वागत...!*
*रत्नागिरी, प्रतिनिधी :
रत्नागिरी नगर परिषदेमधील कथित भ्रष्ट कारभार तसेच आरोग्य विभागातील सफाई कामगारांच्या वेतनासंदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या भूमिकेचे सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार जैन, कायद्याने वागा लोकचळ, व लेबर राईट्स चे जिल्हा प्रतिनिधी यांनी स्वागत केले आहे. सर्व विभागातील कंत्राटी कामगारांना मा. कामगार आयुक्तांनी निश्चित केलेले किमान वेतन, भविष्यनिर्वाह निधी (PF) आरोग्य विमा (ESIC), वार्षिक बोनस व इतर भत्ते यांसारख्या सुविधा मिळाव्यात, यासाठी जानेवारी २०२४ पासून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पगार फरकाच्या मागणीसंदर्भातही रत्नागिरी नगर परिषदेकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत असून, हा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. रत्नागिरी नगर परिषद ‘वर्ग ब’ , परिमंडळ 1 मध्ये येत असून, किमान वेतन कायद्यानुसार आरोग्य विभागातील सफाई कामगारांना आवश्यक त्या सुविधा आणि वेतन मिळणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात या कामगारांना केवळ १४ ते १५ हजार रुपये वेतन मिळत असल्याची बाब समोर आली आहे.
याबाबत तात्कालीन मुख्याधिकारी तुषार बाबर आणि आरोग्य विभाग प्रमुख अविनाश भोईर यांच्या धोरणांमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका बसल्याचा आरोपही जैन यांनी केला आहे. तसेच, प्रलंबित पगार फरकाची जबाबदारी मुख्यनियोक्ता म्हणून नगर परिषदेचे मुख्याधिकारी स्वीकारणार का, याबाबत पालकमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.
मार्च २०२६ दरम्यान सुमारे १०० ते १५० कंत्राटी सफाई कामगारांनी आपल्याला कायद्यानुसार किमान वेतन व इतर लाभ मिळण्याच्या विविध मागणीसंदर्भात तक्रार अर्ज कायद्याने वागा लोकचळवळीच्या लेबर राईट्स मार्फत नगर परिषद प्रशासनाकडे सादर केले असून, अद्याप त्यावर कोणतीही अधिकृत कार्यवाही झालेली नाही. किमान मागील दोन वर्षांचा पगार फरक तात्काळ देण्यात यावा, अशी मागणीही जैन यांनी केली आहे.
दरम्यान, या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी असल्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच, सफाई कामगारांच्या कंत्राटी प्रक्रियेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या सध्याच्या भूमिकेमुळे आता तरी मा. कामगार आयुक्तांनी निश्चित केलेले किमान वेतन कायद्यानुसार सफाई कामगारांना किमान 20 हजार रुपये वेतन, सुमारे ५ हजार रुपयांचा पीएफ, आरोग्य विमा, इतर भत्ते आणि वार्षिक बोनस मिळेल, असा विश्वासही विजयकुमार जैन, कायद्याने वागा लोकचळ, व लेबर राईट्स चे जिल्हा प्रतिनिधी यांनी व्यक्त केला.















