उबाठा गटाला जोरदार धक्का; उक्षीचे माजी सरपंच अनवर गोलंदाज यांचा शिवसेनेत प्रवेश
पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; गाव विकासासाठी काम करणाऱ्या नेतृत्वासोबत राहण्याचा निर्णय – अनवर गोलंदाज
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. उक्षी गावचे माजी सरपंच तसेच उबाठा गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे अनवर गोलंदाज यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनवर गोलंदाज यांचे स्वागत करत त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील जनसंपर्क, सामाजिक कार्य आणि उक्षी गावच्या विकासासाठी केलेल्या कामामुळे अनवर गोलंदाज यांची परिसरात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
पक्षप्रवेशानंतर बोलताना अनवर गोलंदाज म्हणाले की, “गाव विकास, सर्वसामान्य जनतेची कामे आणि कोकणाच्या विकासासाठी काम करणाऱ्या नेतृत्वासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून जनतेची सेवा अधिक प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न राहील.”
पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील विकासकामांना मिळत असलेली गती आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी घेतले जाणारे निर्णय यामुळे अनेक कार्यकर्ते शिवसेनेसोबत जोडले जात असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रवेशामुळे उक्षी तसेच परिसरातील शिवसेना संघटनेला आणखी बळ मिळाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, कुरधुंडा गावच्या माजी सरपंच तथा विद्यमान प्रशासक नाझीमा बांगी (गोलंदाज), नगरसेवक सोहेल मुकादम, उक्षी गावचे माजी सरपंच मिलिंद खानविलकर, माजी उपसरपंच हरिश्चंद्र बडबे, माजी उपसरपंच मंगेश नागवेकर, रमजान गोलंदाज आदी उपस्थित होते.
#ShivsenaForMaharashtra #EknathShinde #UdaySamant #KiranSamant #महाराष्ट्र














