गुहागर-दापोलीतील महिलांनी भारत-पाक सीमेवर सैनिकांना बांधल्या राख्या
: जम्मूजवळील सुचितगड सीमेवर रक्षाबंधनाचा अनोखा उत्सव; १८ जणांच्या यात्रेतील भावनिक क्षण
गुहागर (प्रतिनिधी) : जम्मूजवळील सुचितगड सीमेवर गुहागर आणि दापोली तालुक्यातील महिलांनी भारतीय जवानांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा उत्सव साजरा केला. देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत महिलांनी जवानांना राखी, प्रेम आणि आपुलकीची भावना दिली.
यावेळी सैनिकांनी, “तुम्ही आम्हाला लक्षात ठेवून आवर्जून राखी आणि प्रेम घेऊन आलात, यामुळे आम्हाला खूप आनंद झाला,” अशा भावना व्यक्त केल्या. त्यावर महिलांनी, “तुम्ही आपल्या प्राणांची पर्वा न करता देशाच्या सीमांचे रक्षण करता. त्यामुळेच आम्ही सर्वजण आपल्या घरात सुखाने झोपू शकतो,” असे सांगत जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
भारताच्या सीमावर्ती पूंछ जिल्ह्यातील बुढा अमरनाथ बाबा चट्टानी यात्रेसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली गुहागर व दापोली तालुक्यातील १८ जण सहभागी झाले होते. यात्रेच्या परतीच्या प्रवासात जम्मूजवळील सुचितगड सीमेवर या सर्वांनी भेट दिली. यावेळी पाकिस्तानची सीमा पाहण्यासोबतच तेथे तैनात असलेल्या भारतीय सैनिकांशी संवाद साधण्यात आला. याच वेळी रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला.
या यात्रेत सौ. आसावरी भावे, सौ. अनुष्का आठवले, सौ. स्वरदा भिडे, सौ. गौरी भिडे, सौ. स्वाती महाडिक, सौ. दीपाली साठे, सौ. अद्विता परांजपे, सौ. रंजना गिरी, सौ. मीरा जोशी, दीपाली गिरी, आर्या भावे या महिलांसह श्री. अनिरुद्ध भावे, दीपक साठे, चंद्रकांत महाडिक, उमेश आठवले, मंगेश जोशी आणि मनीष साखरकर हे सहा पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सीमेवर जवानांना राखी बांधण्याच्या या उपक्रमातून देशरक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती असलेला सन्मान, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त झाली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सीमेवर घडलेला हा भावनिक प्रसंग सहभागींसाठीही अविस्मरणीय ठरला.










