मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा : मंत्री नितेश राणे
मुंबई : मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच विभागाचा निधी योग्य पद्धतीने खर्च होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या वाढवावी, असेही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
मत्स्यव्यवसाय विभागाच्या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय विविध योजना महा-डीबीटीच्या माध्यमातून ऑनलाइन उपलब्ध करून देण्याबाबत मंत्रालयात आढावा बैठक झाली. नागरिकांना योजनांचा लाभ जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा, हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे.
भूजलाशयीन, निमखारे पाणी आणि सागरी मत्स्यव्यवसायासाठीच्या ६ राज्यस्तरीय, १९ जिल्हास्तरीय आणि ३ योजनांमध्ये सुधारणा, अशा एकूण २८ योजनांना मान्यता देण्यात आली आहे. यापैकी ४ राज्यस्तरीय, १८ जिल्हास्तरीय आणि २ सुधारित योजनांसाठी, अशा एकूण २४ योजनांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविताना नागरिकांना कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे योजनांचा लाभ मिळावा, अर्ज प्रक्रिया सुलभ असावी आणि कोणताही तांत्रिक अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक नियोजन काटेकोरपणे करण्याच्या सूचना मंत्री राणे यांनी दिल्या.
तसेच, ऑनलाइन प्रक्रियेमुळे पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळण्यात कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
महा-डीबीटीच्या माध्यमातून योजनांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि गतिमान करून पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळवून देण्यावर विभागाने भर द्यावा, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
या बैठकीस मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.









