साटवली-लांजा रस्त्यावरील खावडी मोरीचे खड्डे तरुणांनी स्वखर्चाने बुजवले; श्रमदानातून दाखवले सामाजिक उत्तरदायित्व
प्रशासनाची वाट न पाहता कार्तिक हसये, आर्यन जोशी, आयुष हसये, सार्थक हसये व निलेश तारले यांचा पुढाकार; वाहनधारकांना मोठा दिलासा
लांजा (प्रतिनिधी – जितेंद्र चव्हाण) :
शासकीय यंत्रणेच्या मदतीची किंवा प्रशासकीय कार्यवाहीची वाट न पाहता गावातील तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत साटवली-लांजा रस्त्यावरील खावडी येथील मोरीवरील धोकादायक खड्डे स्वखर्चाने व श्रमदानातून बुजवले. या कौतुकास्पद उपक्रमातून तरुणांनी केवळ समस्या मांडण्यापेक्षा त्यावर प्रत्यक्ष उपाय करण्याचा आदर्श निर्माण केला आहे.
साटवली-लांजा या मुख्य मार्गावरील खावडी येथील मोरीवर गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः रात्रीच्या वेळी खड्डे स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला होता.
ही परिस्थिती लक्षात घेऊन कार्तिक हसये, आर्यन जोशी, आयुष हसये, सार्थक हसये आणि निलेश तारले या स्थानिक तरुणांनी पुढाकार घेतला. ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांनी स्वखर्चाने आवश्यक साहित्याची व्यवस्था केली आणि स्वतः श्रमदान करून मोरीवरील धोकादायक खड्डे बुजवले.
तरुणांचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श
शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह स्थानिक तरुण आणि ग्रामस्थांनी सुट्टीच्या दिवशी एकत्र येत हे काम पूर्ण केले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित होण्यास मदत झाली असून वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केवळ प्रशासनाकडे तक्रारी करून न थांबता आपल्या परिसरातील समस्या स्वतःच्या पुढाकाराने सोडवण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. या उपक्रमातून तरुण पिढीमध्ये श्रमदान, सामाजिक जबाबदारी आणि गावाच्या विकासासाठी योगदान देण्याची भावना अधोरेखित झाली आहे.
वाहनधारकांकडून तरुणांचे कौतुक
खावडी मोरीवरील खड्डे बुजवल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. संभाव्य अपघाताचा धोका कमी झाल्याने प्रवासी, वाहनधारक आणि स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
कार्तिक हसये, आर्यन जोशी, आयुष हसये, सार्थक हसये आणि निलेश तारले यांच्या सामाजिक उपक्रमाचे परिसरातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. “तरुणांनी अशाच प्रकारे सामाजिक बांधिलकी जपत गावाच्या विकासात पुढाकार घ्यावा,” अशी भावना ज्येष्ठांनी व्यक्त केली.









