फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळ भोरची नवी मुंबईत शाखा; अध्यक्षपदी चंद्रकांत दादा जगताप
वाशी येथे शाखेची स्थापना; सामाजिक समता, बंधुता आणि परिवर्तनवादी विचारांच्या प्रसारासाठी विविध वैचारिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबविणार
प्रतिनिधी (मंगेश जाधव) :
फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, भोर या संस्थेची नवी मुंबई शाखा नुकतीच वाशी येथील कॅफे विहार येथे स्थापन करण्यात आली. आंबेडकरी विचार, सामाजिक समता, बंधुता आणि परिवर्तनवादी चळवळीला व्यापक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या शाखेची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी नवी मुंबई शाखेच्या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली.
फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, भोर या संस्थेच्या माध्यमातून गेल्या १६ वर्षांपासून आंबेडकरी चळवळीचे विचार देश-विदेशात पोहोचविण्याचे कार्य सुरू आहे. साहित्य संमेलने, परिसंवाद, चर्चा सत्रे तसेच विविध वैचारिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेकडून सातत्याने सामाजिक प्रबोधनाचे कार्य केले जात आहे.
याच कार्याचा विस्तार म्हणून नवी मुंबई शाखेची स्थापना करण्यात आली असून, या शाखेच्या माध्यमातून भविष्यात विविध वैचारिक, साहित्यिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
नवी मुंबई शाखेच्या पदाधिकाऱ्यांची निवड
शाखा स्थापनेच्या कार्यक्रमात उपस्थितांच्या सर्वानुमते नवी मुंबई शाखेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी चंद्रकांत दादा जगताप, उपाध्यक्षपदी संजय खरात, कार्याध्यक्षपदी भगवान सुरलके व तुषार नेवरेकर, सचिवपदी विलास पवार व चंद्रकांत काकडे, सहसचिवपदी संदेश उघाडे व राजेंद्र बनसोडे, कोषाध्यक्षपदी अनघा जाधव, सहकोषाध्यक्षपदी आदेश गायकवाड, प्रसिद्धी प्रमुखपदी विनोद कांबळे व सिद्धार्थ तर, तर निमंत्रक म्हणून प्रो. अनिल वानखेडे, निलेश राजवर्धन आणि दीपक कासारे यांची एकमताने निवड करण्यात आली.
मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण
यावेळी फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, भोरचे संस्थापक अध्यक्ष प्रो. डॉ. रोहीदास जाधव, वाडिया कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर, प्रो. मेघना भोसले आणि आनंदा गायकवाड यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
समतावादी विचारांच्या प्रसारासाठी प्रभावी काम करणार
नवी मुंबई शाखेच्या माध्यमातून फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचा प्रचार व प्रसार अधिक व्यापक पातळीवर करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
“नवी मुंबई शाखेच्या माध्यमातून विविध वैचारिक, साहित्यिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबवून फुले-शाहू-आंबेडकर यांच्या समतावादी विचारांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शाखा प्रभावीपणे कार्यरत राहील,” असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रकांत दादा जगताप यांनी व्यक्त केला.









