कुणबी समाजाला कुठल्याही राजकीय पक्षांनी गृहीत धरू नये—- संतोष सांगळे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कुणबी समाजाला कुठल्याही राजकीय पक्षांनी गृहीत धरू नये—- संतोष सांगळे

तळवली (वार्ताहर)…….
गुहागर विधानसभा -होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात विशेष करून गुहागर विधानसभा मतदारसंघात कुणबी समाजाचा बाऊ केला जात आहे. याच कारणास्तव गुहागर शहरातील कुणबी समाजाचे युवा कार्यकर्ते संतोष सांगळे यांनी सर्वच राजकीय पक्षांना हा खरमरीत इशारा दिला आहे.
कोकणात विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात कुणबी समाजाचे कार्यबाहूल्य आणि संख्येचे बाहुल्य आहे.या पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभेमध्ये नेतृत्व करणारी अनेक मंडळी याच समाजाची होती. मात्र कालांतराने हाताच्या बोटावर मोजण्या एवढी ही कुणबी समाजाची नेतृत्व राजकारणात शिल्लक राहिली नाही. याचा विचार समाजाने करणे गरजेचे आहे.विधानसभेच्या निवडणुका आल्या की या जिल्ह्यामध्ये सर्वच पक्षाच्या राजकीय लोकांना आणि आणि कुणबी समाजातील स्वहित जपणाऱ्या लोकांना या आमच्या समाजाची आठवण पडते. खरं म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत पाचही विधानसभा मतदारसंघात कुणबी समाजाचे बाहुल्य आहे असे असताना मात्र कुणबी समाजाचे राजकारण हे फक्त गुहागर विधानसभा मतदारसंघापुरतेच फिरवले जात आहे याचाही विचार होणे गरजेचे आहे. खरं म्हणजे गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये कुणबी समाजाची किंवा ओबीसी समाजाचे नेतृत्व करायला सरसावलेल्या नेतृत्वाने हाही विचार केला पाहिजे की आपल्या समाजाने काय किंवा राजकीय पक्षांनी काय आपल्याला शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात नेतृत्वाची संधी ज्या ज्या वेळेला दिली त्या त्या वेळेला आपला विजय झाल्यानंतर आपण आपल्या समाजासाठी किंवा आपल्या कार्यक्षेत्रातील ओबीसी लोकांसाठी कोणती विधायक कामे केलीत ?कोणती समाजाच्या विकासाची कामे केलीत ?? समाजाच्या युवकांचा लोंढा पुणे – मुंबई सारख्या शहराकडे जात असताना आपण तो थांबवण्यासाठी काय केल ?? याचाही विचार करावा. की आपल्याला भेटलेल्या पदाचा उपयोग फक्त आपल्या आणि आपल्याच सर्वांगीण विकासासाठी केलात याचाही विचार झाला पाहिजे. आपण जर कुणबी समाजाचे नाव पुढे करतोय तर मग कुणबी समाजाचे बाहुल्या असताना केसरकर,डी.बी.घाणेकर, रामभाऊ बेंडल अगदी आत्ताच उदाहरण घ्यायचं झालं तर पाच वर्षांपूर्वी सहदेव भेटकरांचा पराभव का झाला ?? याचही आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. मी कुणबी समाजाचा नेता किंवा मी ओबीसीचा नेता असं म्हणून घेणारे नेतृत्वाने गेल्या पाच – दहा वर्षात आपण कुणबी समाजासाठी, आपण ओबीसी समाजासाठी काय केलं ?? याचाही एकदा लेखाजोगा मांडणे गरजेचे आहे. आणि याच बरोबरीने जिल्ह्यात विविध राजकीय पक्षातून नेतृत्व करणारे मंडळी आपला बुद्धिबळातील प्याद्याप्रमाणे आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेत नाहीत ना ?? हे एकदा तपासणे गरजेचे आहे. जी मंडळी गुहागर विधानसभा मतदारसंघात कुणबी समाजाचा किंवा ओबीसीचा उमेदवार उभा राहिला पाहिजे यासाठी हट्ट धरतात त्यांनी कुणबी समाजाचा किंवा ओबीसी समाजाचा उमेदवार आपल्या मतदार संघात का उभा करत नाही ?? असाही आपण सर्वांनी प्रश्न विचारणे ही काळाची गरज आहे. या जिल्ह्यातील विविध पक्षातील राजकीय नेतृत्व “”या जिल्ह्याचा नेता कोण किंवा कोकणचा नेता कोण ??”” या स्पर्धेमध्ये आपल्या कुणबी समाजाचा किंवा ओबीसी समाजाचा हत्यार म्हणून वापर करत नाही ना ?? याचेही आत्मपरीक्षण आपण करणे गरजेचे आहे. या पूर्ण कोकणातील कुणबी समाज, ओबीसी समाज हा त्यांच्या त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे किंवा त्या त्या पक्षाने त्यांना जे योगदान दिले आहे त्याप्रमाणे प्रत्येक पक्षाशी निगडित आहे. त्यामुळे कुठला उमेदवार निवडावा ?? कोणाला नेतृत्व करण्याची संधी द्यावी ?? याचा विचार करण्याचे स्वातंत्र्य ज्याला त्याला असणं गरजेचं आहे.निवडणुकांपुरता कुणबी समाजाचा किंवा ओबीसी समाजाचा वापर न करता ही 2024 ची निवडणूक संपली की 2029 मध्ये कुणबी समाजाचा किंवा ओबीसी समाजाचा आमदार आपल्याला या गुहागर विधानसभा मतदारसंघातून द्यायचा असेल तर त्याची खरी तयारी ही आपण 2024 च्या विधानसभेचे निकाल लागले की त्यानंतरच करणे हे सोयीचे होईल. त्यामुळे एक महिन्याच्या अवधीवर आलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती कुठल्याही राजकीय पक्षाने या गुहागर विधानसभा मतदारसंघातील कुणबी समाजाला, ओबीसी समाजाला गृहीत धरू नये. केवळ निवडणुका आल्या की मी कुणबी समाजाचा आहे मी ओबीसीचा आहे या मतांचे भांडवल करून तिकीट मागणाऱ्यांनी समाजाला गृहीत धरू नये अन्यथा आजचा युवक हा सुशिक्षित असून त्याचे उत्तर अशा नेत्यांना दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही समाज एकत्रही केलाय आणि निवडणुकाही यशस्वीपणे जिंकून दाखविल्या आहेत त्यामुळे दिशाभूल करू नयेअसे जाहीर आवाहन गुहागर शहरातील कुणबी समाजाचे युवा कार्यकर्ते संतोष सांगळे यांनी केले आहे.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

Leave a Comment

आणखी वाचा...