माजी आम.डॉ. विनय नातूच ठरतील राजेश बेंडल यांच्या विजयाचे शिल्पकार – सुरेशजी भायजे.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

माजी आम.डॉ. विनय नातूच ठरतील राजेश बेंडल यांच्या विजयाचे शिल्पकार – सुरेशजी भायजे यांचे स्पष्ट प्रतिपादन..!
आबलोली (संदेश कदम)
गुहागर मध्ये आम.भास्करशेठ जाधव विरुद्ध श्री.राजेश बेंडल यांच्यात समोरासमोर चुरशीची लढत होणार असून साऱ्या गुहागर मतदार संघाचे व महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीने वेधले आहे. श्री.राजेश बेंडल यांच्या विजयाचे खरे शिल्पकार गोरगरीब कष्टकरी समाजाचे नेते, माजी आमदार विनय नातूच ठरतील असे स्पष्ट प्रतिपादन बळीराज सेनेचे उपाध्यक्ष श्री. सुरेशजी भायजे यांनी गुहागर येथील मीटिंग मध्ये व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, डॉ. विनय नातू हे गुहागरचे माजी आमदार असून यावेळी महायुतीतील भाजप पक्षाकडून उमेदवारी मिळेल म्हणून गेली दीड -दोन वर्ष गुहागर विधानसभा मतदार संघाची ते बांधणी करीत होते, मात्र यावेळी गुहागर विधानसभा मतदारसंघातून महायुतीने भाजपला उमेदवारी न देता शिवसेनाला उमेदवारी दिल्याने शिवसेनेतून श्री.राजेश बेंडल यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. डॉ. नातू म्हणजे सच्चा, स्वाभिमानी व निष्कलंक नेतृत्व असून पक्षाकडून एवढा अन्याय होऊनही त्यांनी बंडखोरी केली नाही हे कुणबी बहुजन समाजाला अभिमानास्पद आहे. त्यांचा पूर्व इतिहास पाहिला तर २००९ ला त्यांनी श्रीधर सेना स्थापन करून बंडखोर म्हणून अपक्ष लढले होते, त्यामुळे रत्नागिरीतीलच नव्हे तर सा-या महाराष्ट्रातील राजकीय नेत्याना त्याची चांगली चपराक बसली होती. त्यांनी उभ्या आयुष्यात राजकारण्यांचा कधीच अन्याय अत्याचार खपवून घेतलेला नाही. असं कणखर, स्वाभिमानी नेतृत्व म्हणजे डॉ.विनय नातू असल्याचे मत भायजे यांनी व्यक्त करत ते पुढे म्हणाले की,
गुहागर मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र सेवा करणारे, जनतेचे कैवारी लोकनेते कै. तात्यासाहेब नातू यांची अगणित पुण्याई आहे. गुहागर मधील सर्वाधिक अपघाती मृत्यूचे प्रमाण हे सर्पदंश व विंचुदंश यामुळे होत असल्याने शासनाने त्यावर जालीम औषधाची उपाय योजना करावी असं त्यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न डॉ. विनय नातू यांच्या माध्यमातून सत्यात उतरलं , शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून त्याना विंचू दंश व सर्पदंशावर शासनाने संशोधनातून जालीम लसऔषध शोधण्यास यश आलं होत.त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्पदंश,विंचूदंश वरील औषधाने अनेकांचे प्राण वाचले.डॉ.नातू हे जिल्ह्यात फिरत असताना त्यांना अनेकांच्या घरा खालच्या जमिनी मालकी हक्काच्या नसल्यामुळे घर दुरुस्ती ,बांधणी व परिसरात फळ लागवडीसाठी जमीन मालकांचा त्रास होत होता. यासाठी त्यांनी शासनाकडे विशेष प्रयत्न करून व जन जागृती करून रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो लोकांना त्यांच्या घरा खालच्या जमिनीचा मालकी हक्क मिळवून दिला. रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासोबतच शाश्वत विकासावर त्यानी अधिक भर दिल्याने ते गुहागर मतदारसंघात खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या या लोकप्रियतेचा मुळेच श्री राजेश बेंडल यांच्या विजयाचे खरे शिल्पकार हे माजी आम. डॉ. विनय नातूच असतील असे मत भायजे यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. यावेळी बळीराज सेनेचे सरचिटणीस नंदकुमार मोहिते, जिल्हाप्रमुख पराग कांबळे, उपाध्यक्ष दत्ताराम लांबे, गुहागर तालुकाप्रमुख निवाते गुरुजी, संपर्कप्रमुख संतोष निवाते , हरिश्चंद्र धावडे आदी प्रमुख मान्यवर पदाधिकारी व बळीराज सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

Leave a Comment

आणखी वाचा...