
वानर / माकडांच्या त्रासाने शेतकऱ्यांनी शेती सोडली,अशीच परिस्थिती राहीली तर कोकणातील गावांचे वृद्धाश्रम नक्की
तळवली (मंगेश जाधव).
२५ वर्षापुर्वी कोकणातील सिंधुदुर्ग,रत्नागिरी व रायगड जिल्हामध्ये मोठया प्रमाणात भातशेती केली जात होती.कालांतराने येथे वानरांचे प्रमाण वाढत गेले आणि भातशेती / बागायती शेती ओस पडत गेली परिणामी कोकणातील तरूण / तरूणी नोकरी / व्यवसायाच्या शोधात मुंबईकडे वळल्याने गावे वृद्धाश्रम होत गेली आहेत.
वानरांच्या त्रासामुळे कोकणातील भात,नाचणी,वरी,कुळीथ,तुर या पारंपारीक नगदी पिकांची नासाडी होऊ लागली तर फळांचा राजा हापूस आंबा,फणस,काजू,नारळ,सुपारी,रातांबा,पेरू,चिकू ह्या कमरशिअल पिकांचे अतोनत नुकसान होऊ लागले आहे.शेवगा,भेंडी,गवार,गोंडा ( झेंडूची फूले ), पालेभाज्या,काकडी,पडवळ,दोडके,चिबूड यांना वानर वेलासकटच खात असल्याने शेतकऱ्यांनी जवळपास यांची लागवड करणेच सोडून दिले आहे.तर बांबू ( कोंडा ) ही वनस्पती माकडांनी कोकणातून जवळपास नामशेष केली आहे.
कोकणातील अनेक शेतकऱ्यांकडे आजही वडीलोपार्जित शेतयुक्त जमिन आहे,मुबलक पाणी आहे,माणसही आहेत,बैलजोडी आहे मात्र तरीही वानरांच्या त्रासामुळे शेती सोडलेली आहे.याला जबाबदार कोण?
आजपर्यंत कोकणातील अनेक नेते आमदार,खासदार आणि कॅबिनेट मंत्री झालेत,मात्र वृद्धाश्रम झालेल्या यांच्या मतदार संघातील हया मोठया समस्येकडे पाहण्यासाठी कोणालाही वेळ नाही,कोकणात गेली ७५ वर्ष रस्ते व पाणी यावरच निवडणूका लढवल्या गेल्या,पण रोजगाराचे काय?
मागील काही वर्षापासून रत्नागिरीतून श्री.अविनाश काळे ह्या शेतकऱ्यांने यासंदर्भात मोठे रान उठवले होते,मात्र निवडणूका जवळ आल्या की मंत्रीमहोदय चार वानर पिंजऱ्यामध्ये पकडतात आणि पुढील सहा महीने त्याच्या बातम्या पेरत राहतात.पुन्हा परिस्थिती जैयच्या थै.
*हापूस आंबा* : कोकणातील रत्नागिरी आणि देवगडचा हापूस आंबा हा जगप्रसिद्ध आहे.बागायतदार दरवर्षी कलमांना खत घालणे,औषधांची फवारणी करणे,गवत काढणे,साफसपाई,बागेचे कुंपण,राखनदार गडी यासाठी लाखो रूपये खर्च करतात आणि मार्च / एप्रिलच्या दरम्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी घास आला की मोठा वानर / माकडांचा कळप बागेत येतो आणि काही आंबे खातो तर काही कलमांच्या झाडांवर उड्या मारून फळे खाली पाडून जातो,पुढे वानरांचा हा नित्यक्रमच होतो.शिवाय हापूसला हवी भाव नाही.त्यात अवकाळी येणारा पाऊस याच्याने कोकणातील शेतकरी पूर्णता हवालदिल झालाय.हिच परिस्थिती फणस,नारळ,सुपारी,रातांबा यांची मग कोकणातील शेतकऱ्यांने शेती कशी करायची?
२५ वर्षापुर्वी कोकण शेतीपुरक असल्याने साधारण घरातील एका मुंबईकर चाकरमन्याच्या मनिऑर्डरवर गावातील पूर्ण परिवार चालत होते पण आज ह्या वानरांच्या त्रासामुळे गावाची परिस्थिती बरोबर उलटी झालेली आहे.गावात २ म्हातारा म्हातारी आणि पूर्ण परिवार मुंबईत.परिणामी कोकणातील जिल्हा परिषद शाळा पटाविना बंद पडायला लागल्यात,त्यातूनच एखादा तरूण गावाला शेतीसाठी राहीलाच तर त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नाही,मुलीचे नातेवाईक विचारतात शेतीचे उत्पन्न किती?ही आहे वानराची करामत.
वानर हा प्राणी फक्त शेतीचेच नुकसान करतोय असे नाही तर लोकांच्या घराची कौले व पत्रे फोडतो आणि घरात घुसून प्रसंगी धान्य व बनवलेले जेवणही खातो.
कोकणात आज वानरांच्या त्रासाने शेतकऱ्यांनी पारंपारीक शेती सोडलीय,येथे रोजगार लपलब्ध नसल्याने तरूण तरूणी मुंबईची वाट धरत आहेत,भविष्यातही अशीच परिस्थिती राहिली तर कोकणाची अवस्था खूप बिकट आहे.
त्यामुळे महाराष्ट्र शासनाने वानर / माकड यांना उपद्रव्य प्राणी म्हणून घोषित करावे,त्यांना पकडून लांब अभयारण्यांत सोडावे किंवा त्यांची नसबंदी तरी करावी.अन्यथा कोकण सामुदायिक वृद्धाश्रम झाल्याशिवाय राहणार नाही.
आपला स्नेहांकित :*
*श्री.यशवंत जडयार*
सामाजिक कार्यकर्ते राजापूर / मुंबई
मो.9270537178 Wh. 8698194851

Author: Mangesh Jadhav
मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.