पनवेलमध्ये पकड मजबूत करण्यासाठी
भाजपला “ठाकूर” शाही शिवाय पर्याय नाही
तळवली (मंगेश जाधव)..
पनवेल – पनवेल आणि लोकनेते रामशेठ ठाकूर हे समिकरण वर्षानुवर्षे घटटच राहिले आहे. एकूणच पक्ष कोणताही असो पनवेलचे राजकारण लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ठाकूण घराण्याभोवतीच फिरते. आधी काँग्रेस, शेकाप आणि आता भाजप तिन्ही पक्षात त्यांनी पक्षांतर केले. काळाची पावले ओळखत आणि दुरदृढी टाकत या ठाकूर पितापूत्रांनी आपले राजकीय अस्तित्व अबाधित राखले. आता प्रशांत ठाकूर यांना सलग चौथ्यांदा मिळालेला विजय भाजपच्या वाढत्या प्रभावाची चाहूल असली तरी पनवेलमध्ये राजकीय दृष्टया आपली पकड मजबूत करण्यासाठी भाजपला या ठाकूर पितापुत्रांशिवाय पर्याय नाही हेच सिध्द करते.
प्रशांत ठाकूर यांच्या घरातच राजकारण आहे. वडील रामशेठ ठाकूर माजी खासदार असून राज्यातील मातब्बर नेते आहेत. प्रशांत यांनी सिव्हिल इंजिनीयरिंगच्या द्वितीय वर्षापर्यंत शिक्षण घेतलं आहे. वाचन, पर्यटन आणि संगीत या त्यांच्या आवडत्या गोष्टी आहेत.
तत्कालीन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी शेकापला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी पनवेल नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता आणली. त्यामुळे शेकापला मोठं आव्हान मिळालं. काँग्रेसमधून त्यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर पहिल्यांदा
2009मध्ये विजयी झाले. शेकापचे बळीराम पाटील यांचा पराभव करत प्रशांत ठाकूर विजयी झाले आणि त्यांचा राजकारणात उदय झाला. त्यामुळे काँग्रेसचा पहिल्यांदाच विधानसभेत झेंडा फडकला होता.
त्यानंतर 2014 मध्ये भाजपची राज्यात सत्ता येणार असल्याची चाहूल लागताच पिता-पुत्रांनी खारघर टोलनाक्याचा प्रश्न उपस्थित करून भाजपमध्ये प्रवेश केला. प्रशांत ठाकूर यांनी 2014 मध्ये भाजपमधून निवडणूक लढवली आणि जिंकलेही. मात्र फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळू शकले नाही. 2019 मध्ये त्यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा होती. मात्र, भाजप ऐवजी महाविकास आघाडीचं सरकार आल्याने सर्व गणितं बदलली. त्यामुळे ठाकूर यांचं मंत्रिपदाचं स्वप्नही भंगलं. मात्र, 2014 मध्ये भाजपने त्यांना सिडकोचं अध्यक्षपद देऊन पक्षाचीही ताकद वाढवली होती.पनवेलमध्ये शेकाप आणि शिवसेनेला रोखण्यात ठाकूर पिता-पुत्रांनी यश मिळविलेलं आहे. कोरोना काळात त्यांनी पनवेलकरांना मोठी मदत केली. पाच महिने ते नागरिकांच्या मदतीसाठी धावून जात होते. गरजू, झोपडीट्टीधारकांना त्यांनी विशेष मदत केली. पनवेलमध्ये मोदी किचनच्या माध्यमातून त्यांनी दोन महिने गरजूंना अन्न वाटप केलं. पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर भाजपला एकहाती सत्ता मिळवून देण्याचे यश प्रशांत ठाकूर यांनाच जाते. पनवेलमधून सलग चारवेळा निवडून येण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे. पहिली निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर लढवून ते आमदार झाले. त्यानंतर भाजपमध्ये येऊन त्यांनी तीन विधानसभा निवडणुका लढवल्या आणि तिन्ही निवडणुकांमध्ये प्रचंड यश मिळविलं.
♥ हे हि बातमी वाचा ..
https://ratnagirivartahar.in/archives/4619

Author: Mangesh Jadhav
मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.