कितीजणांची वर्णी लागणार सत्ता वाटपात?;
मुंबई -भाजप नेतृत्त्व जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेताना माझ्याकडून कोणताही अडसर नसेल, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा काल सोडला. शिंदेंनी माघार घेतल्यानं देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी जवळपास नक्की मानलं जात आहे. मुख्यमंत्रिपदाचा त्याग करणाऱ्या शिवसेनेला चांगली खाती मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेला एकूण १२ मंत्रिपदं मिळू शकतात.
राज्याच्या मंत्रिमंडळाची कमाल सदस्य संख्या ४३ इतकी आहे. विधानसभेतील आमदारांचा आकडा २८८ इतका आहे. यात महायुतीच्या आमदारांची संख्या २३४ इतकी आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी वर्णी लावताना महायुतीमधील तिन्ही पक्षांची चांगलीच दमछाक होणार आहे. कोणाला संधी द्यायची आणि कोणाला मंत्रिपदं नाकारायची, असा मोठा पेच आहे. सगळीच्या सगळी ४३ मंत्रिपदं एकाचवेळी भरली जात नाहीत, असं भूतकाळ सांगतो.
महायुतीत १३२ जागांसह मोठा भाऊ ठरलेल्या भाजपच्या वाट्याला जवळपास निम्मी मंत्रिपदं येऊ शकतात. भाजपला २१ मंत्रिपदं मिळण्याची दाट शक्यता आहे. यातील १५ मंत्रिपदं पहिल्या टप्प्यात भरली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या वाट्याला १२, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात १० मंत्रिपदं पडू शकतात. शिवसेना पहिल्या टप्प्यात ९, तर राष्ट्रवादी ८ जणांना संधी देऊ शकते. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्याच फटक्यात सगळी मंत्रिपदं भरणार नाही. त्यामुळे गेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर जसे अनेकांचे शपथविधीसाठी लागणारे कोट कपाटातच राहिले, तशीच वेळ आताही येऊ शकते.
सत्तेत २३४ आमदार असल्यानं मंत्रिपदांसाठी प्रचंड स्पर्धा आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीची महायुतीची एन्ट्री झाली. त्यांना ९ मंत्रिपदं देण्यात आली. त्यानंतरही १५ मंत्रिपदं रिक्त होती. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होत राहिली. इच्छुक गुडघ्याला बाशिंग लावून बसले होते. पण शपथविधीच न झाल्यानं अनेक आमदारांना कपाटातील कोट बाहेर काढण्याची संधीच मिळाली नाही. आताही तसंच घडण्याची दाट शक्यता आहे.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.