सुयश कॉम्प्युटरच्या शिरपेचात मानाचा तुरा! सलग 16 वर्ष एमकेसीएल कडून गौरव.
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटरला महाराष्ट्र ज्ञान महामंडळ म्हणजेच एमकेसीएल कडून सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्था पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची विभागी बैठक सिंधुदुर्ग येथील हॉटेल आराध्या येथील मराठा समाज हॉल येथे उत्साहात पार पडली. हा पुरस्कार एमकेसीएलच्या मॅनेजमेंट डायरेक्टर विणा कामत यांच्या हस्ते देण्यात आला. हा पुरस्कार सुयश कॉम्प्युटर सेंटरचे संचालक संदेश साळवी आणि संचालिका सावी साळवी, कन्या आदिती साळवी यांनी दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी एकत्र स्वीकारला.
आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर संगणक प्रशिक्षण संस्था गेली 24 वर्षापासून आबलोली येथे विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे देत आहे. सलग 16 वर्ष संस्थेला पुरस्कार प्राप्त होत आहे.सर्वसामान्य गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देऊन नोकरीला लावणे, महाराष्ट्र ऑलंपियाड मुव्हमेंट स्पर्धा परीक्षा आयोजन, इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेची तयारी संदर्भात मार्गदर्शन, कॉलेज विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा मार्गदर्शन, फ्युचर वेध इ-टेस्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स मार्गदर्शन, सांगा टक्के बक्षीस पक्के उपक्रम, इयत्ता दहावी- बारावी अंतिम निकालपत्र वाटप, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम, विद्यार्थी करियर मार्गदर्शन आणि स्नेहसंमेलन, जागतिक संगणक साक्षरता दिनानिमित्त कार्यशाळा आयोजन, विविध शिबिरांचे आयोजन, दिनदर्शिका भेट, महिलांसाठी डिजिटल सहेली आदी. उपक्रम सातत्याने राबविल्याने सलग 16 वर्षीही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आपल्या MS-CIT केंद्राच्या 24 वर्षाच्या प्रवासात हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली. संगणक साक्षरते सोबत विद्यार्थ्यांना जॉब रेडी सुद्धा करत आहोत. विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच हा प्रवास शक्य झाला. या यशात सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांची आणि सर्व सहकाऱ्यांची आठवण पुरस्कार स्वीकारताना आली. पुरस्कारामुळे संस्थेचे नाव उंचावले आहे या यशामागे सुयश कॉम्प्युटर प्रशिक्षण संस्थेतील सर्वच सहकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.हा अवॉर्ड मी माझ्या केंद्रात संगणक ज्ञान मिळवलेल्या तसेच कोर्स पूर्ण करून जॉब प्लेसमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी समर्पित करतो. अशी कृतज्ञता संदेश साळवी यांनी व्यक्त केली.
पुरस्कार प्रदान करतेवेळी एमकेसीएलचे विभागीय सहव्यवस्थापक अतुल पतोडी, अमित रानडे, नटराज सर, तुषार सर, कोकण विभाग समन्वयक मंगेश जाधव, रत्नागिरी जिल्हा समन्वयक संतोष कोलते, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रणय तेली तसेच जिल्ह्यातील सर्व संगणक संस्थाचालक उपस्थित होते.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.