बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे कोणी आरोपी असतील त्यांना कडक शासन झालंच पाहिजे अन्यथा आमच्या सरकारवर ठपका पडेल; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं विधान
अहिल्यानगर– बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेप्रकरणी सर्वच क्षेत्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे. मात्र, अद्यापही या प्रकरणातील काही आरोपी फरार आहेत. या फरार आरोपींवर तात्काळ अटकेची कारवाई करण्यात यावी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी मोर्चाला संबोधित करताना विविध नेत्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, या घटनेवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांनी देखील मोठं भाष्य केलं आहे. ते शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनाला आले असता पत्रकारांशी बोलत होते. मस्साजोगच्या सरपंच हत्या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे. या घटनेत जे कोणी आरोपी असतील त्यांना कडक शासन झालंच पाहिजे, अन्यथा आमच्या सरकावर तो ठपका पडेल, असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.
बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंत्री भरत गोगावले म्हणाले, “बीड जिल्ह्यात जी हत्येची घटना घडली ती अंत्यत दुर्देवी आहे. ही हत्या अत्यंत निर्घृण पद्धतीने करण्यात आलेली आहे. या घटनेत जे-जे आरोपी असतील त्याला शासन व्हायला पाहिजे. आमचं महायुतीचं सरकार जर हे करू शकलं नाही तर तो ठपका आमच्यावर पडेल, असं मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलं आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्रीही बीडच्या प्रकरणावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Author: Ratnagiri Vartahar
⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️