🔷 वारस दाखला दिल्याने ग्रा. पं. खरवते सरपंच अपात्र
रत्नागिरी :- ता चिपळूण जि रत्नागिरी मधील ग्रामपंचायत खरवते मधील सरपंच ज्ञानदेव नारायण घाग यांना विभागीय आयुक्त,कोकण विभाग यांनी सरपंच पदावरून दूर करण्याचे आदेश दिले आहेत.
सरपंचपदाचा गैरवापर करून बनावट मृत्यू दाखल्याच्या आधारे वारस दाखला दिल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सुनील राजाराम घाग (रा. वसई, पालघर) यांनी यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी यांच्याकडे तक्रार दिली होती.
खरवते (ता. चिपळूण) येथील विद्यमान सरपंच ज्ञानदेव नारायण घाग यांनी सुहास विष्णू महाडिक यांना त्यांचे बेपत्ता असलेले भाऊ काशिनाथ विष्णू महाडिक हे अविवाहित तसेच मयत असून त्यांचा मूलगा, मुलगी व पत्नी यापौकी कोणीही वारस नाही. असा वारस दाखला ६ जानेवारी २०२२ ला दिला आहे.जावक क्र. 28 सन 2021-22 या वारस दाखल्याच्या आणि बनावट मृत्यू दाखल्याच्या आधारे सुहास महाडिक यांनी बेकायदेशीररित्या फेरफार करून काशिनाथ महाडिक यांचे नाव जमिनीच्या हिश्शातून कमी करून ते आपल्या नावे केली. सुहास महाडिक हा ज्ञानदेव घाग यांचा भावोजी आहे. आपले हितसंबंध जोपासण्यासाठी त्यांनी सरपंचपदाचा गैरवापर केल्यानंतर सुनील राजाराम घाग यांनी प्रथम चिपळूण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार केली. तेथून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही म्हणून सुनील घाग यांनी १५ मार्च २०२४ रोजी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सरपंच ज्ञानदेव नारायण घाग यांनी दिलेल्या वारस दाखल्याबाबत तसेच बेपत्ता असलेल्या भावाचा बनावट मृत्यू दाखल्या बाबत चौकशी करण्याबाबत तक्रार केली. त्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेने याबाबत चिपळूण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून अभिप्राय मागिवला. १९७० ते १९८५ या कालावधीतील मृत्यु नोंदवही १९९० चे जळीतामध्ये नष्ट झालेले आहे. त्यामुळे त्याची पडताळणी करता येत नाही. तसेच सदरचा मृत्यू दाखला पंचायत समिती कार्यलयातून देण्यात आलेला नाही त्याची पंचायत समिती चिपळूण कार्यलयात नोंद नाही असे चिपळूण पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविले. सुहास विष्णू महाडिक यांच्या मागणीनूसार मी सदरचा वारस दाखला दिल्याचे सरपंच ज्ञानदेव घाग यांनी आपली बाजू मांडताना सांगितले होते. मात्र खरवते ग्रामपंचायतीच्या दस्तऐवजमध्ये सुहास महाडिक यांचे मागणीपत्र नाही.तसेच ग्रामपंचायत खरवते कार्यलयात वारस दाखल्याची जावक नोंदवही मध्ये नोंद केलेली नाही.
ग्रामपंचायत स्तरावरून देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये वारस दाखल्याचा समावेश नाही. त्यामुळे वारस दाखला ग्रामपंचायतीला देता येत नाही. वारसा दाखला देणे हे न्यायालयाच्या कार्यकक्षेत येत असल्याने या प्रकरणी खरवते सरपंच घाग यांनी इतर प्राधिकरणाच्या अधिकारात हस्तक्षेप करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 39 (1)नूसार कर्तव्यास कसूर केलीआहे.हितसंबंध जोपासले त्यामुळे त्यांना सरपंच पदावरून दूर करण्यात आले आहे.
वारस दाखला दिल्याने ग्रा. पं. खरवते सरपंच अपात्र

Author: Nilesh Rahate
🔴 निलेश रहाटे 🔴 मिडिया प्रतिनिधि - रत्नागिरी वार्ताहर. ता. जिल्हा - रत्नागिरी