बंदर परवाना हस्तांतरणासाठी १५ हजारांची लाच; दोन मत्स्य व्यवसाय अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीला अटक!
मुंबई : मासेमारी बंदराचा मुंबई परवाना रद्द करून अलिबाग येथे हस्तांतरित करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून सहाय्यक आयुक्त पुल्लकेश कदम आणि सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी नीरज चासकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली आहे. या कारवाईत एका खासगी व्यक्ती संजय धनाजी कोळी यालाही अटक करण्यात आली आहे.
प्रकरणाचा तपशील
तक्रारदार यांची स्वतःची मासेमारीची फायबर बोट असून, त्यांच्याकडे मुंबई शहराचा बंदर परवाना आहे. त्यांनी हा परवाना रद्द करून अलिबाग येथे हस्तांतरित करण्यासाठी ९ ऑक्टोबर २०२३ रोजी सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय कार्यालयात अर्ज केला होता. जानेवारी २०२५ पर्यंत आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतरही त्यांचे काम प्रलंबित होते.
१९ फेब्रुवारी रोजी कार्यालयातील खासगी व्यक्ती संजय कोळीने तक्रारदारांना फोन करून १५ हजार रुपये दिल्यास परवाना हस्तांतरित होईल, असे सांगितले. या प्रकरणी तक्रारदारांनी २० फेब्रुवारी रोजी ACB कडे तक्रार दाखल केली.
रंगेहाथ सापळा आणि अटक
ACB च्या पडताळणीत संजय कोळीने तक्रारदारांच्या कामासाठी पुल्लकेश कदम यांना ५ हजार रुपये आणि नीरज चासकर यांना १० हजार रुपये देण्याची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर ACB ने सापळा रचून कदम यांना ५ हजार आणि चासकर यांना १० हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
खासगी व्यक्ती संजय कोळीलाही ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ आणि १२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.