राजापूरमध्ये शिवसेना बळकट होणार – आमदार किरण सामंत
राजापूर : “राजन साळवी यांनी योग्य वेळी निर्णय घेतला असता, तर आज परिस्थिती वेगळी असती. आम्ही त्यांना एकनाथ शिंदे यांच्या सोबत यावे म्हणून प्रयत्न केले होते. उदय सामंत यांनी योग्यवेळी निर्णय घेतला आणि त्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास पुढे गेला,” असे प्रतिपादन राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी केले.
माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षांतर केल्यानंतर पहिल्यांदाच राजापूरमध्ये येऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली. या वेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात आमदार किरण सामंत यांनी भविष्यातील राजकीय दिशा स्पष्ट केली.
शिवसेनेचा विस्तार आणि विकास प्रकल्पांना गती
“राजन साळवी आणि माझे नाते जुने आहे. पूर्वी आम्ही प्रतिस्पर्धी होतो, पण शत्रू नव्हतो. आता आम्ही एकत्र आल्याने राजापूर-लांजा मतदारसंघात शिवसेना अधिक जोमाने काम करेल. आगामी ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आपण एकजुटीने जिंकू,” असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.
यासोबतच मतदारसंघातील विकासकामांबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. “राजापुरातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचे हस्तांतरण लवकरच पूर्ण होईल, तसेच येत्या बजेटमध्ये त्यासाठी निधीची तरतूद केली जाईल. तालुक्यातील २० शाळांचे नूतनीकरण सुरू असून, दुसऱ्या टप्प्यात आणखी ४० शाळांचे नूतनीकरण करण्यात येईल. शिवाय, ४२० कोटी रुपयांचा डीपीआर तयार करून महावितरणच्या समस्यांवर तोडगा काढण्यात येणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
‘हातात हात घालून काम करू’ – राजन साळवी
माजी आमदार राजन साळवी यांनीही शिवसेनेच्या भविष्यासाठी सहकार्याचे संकेत दिले. “राजकारणात कालचा शत्रू आज मित्र होतो. एकनाथ शिंदे यांनी मला पक्षात येण्यासाठी बोलावले होते, मात्र आता आपल्याला शिवसेनेच्या बळकटीसाठी एकत्र काम करायचे आहे. भूतकाळ विसरून भविष्यातील विकासावर भर देऊया,” असे साळवी यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: Prachi Sutar
Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.