💥निर्मल ग्रामपंचायत काताळे चे नवीन इमारतीचं पालकमंत्री उदयजी सामंत यांचे हस्ते उद्घाटन….
💥 निर्मल ग्रामपंचायत काताळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन; निमंत्रण पत्रिका वादाच्या भोवऱ्यात… पत्रिकेत स्थानिक आमदार यांचं नाव नाही.

गुहागर: तालुक्यातील पडवे जिल्हा परिषद गटातील निर्मल ग्रामपंचायत काताळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन ३ मार्च २०२५ रोजी दुपारी २:३० वाजता पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी आमदार डॉ. विनयजी नातू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सोबत निमंत्रण पत्रिका जोडत आहे.👇
गेल्या १५ वर्षांपासून खाजगी इमारतीत सुरू असलेल्या ग्रामपंचायतीसाठी नव्या वास्तूचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. ग्रामपंचायत फंड व जनसुविधा योजनेंतर्गत मंजूर निधीतून जुवेकर स्टॉप येथे ही नव्या स्वरूपाची इमारत उभारण्यात आली आहे. ग्रामस्थांसाठी अधिक सोयीची आणि प्रशस्त असलेली ही इमारत आता स्थानिक प्रशासन आणि नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
ग्रामस्थांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम
सन २०१० मध्ये तवसाळ-पडवे ग्रूप ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन निर्मल ग्रामपंचायत काताळे अस्तित्वात आली. मात्र, यानंतरही ग्रामपंचायतीला स्वतःची इमारत नव्हती. त्यामुळे गेल्या १५ वर्षांपासून ग्रामपंचायतीचे सर्व कामकाज खाजगी इमारतीतूनच सुरू होते.
गेल्या काही वर्षांत स्थानिक नेत्यांनी व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी नवीन इमारतीसाठी प्रयत्न सुरू केले. अखेर ग्रामपंचायत फंड आणि जनसुविधा योजनेंतर्गत आवश्यक निधी मंजूर होऊन नवी इमारत बांधण्याचा मार्ग मोकळा झाला.
शिवसेना (UBT) गटाच्या नाराजीचा सूर; आमदार भास्कर जाधव यांना निमंत्रण न दिल्याने वाद आणि उघड नाराजी
या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक आमदार भास्कर शेठ जाधव यांचे नाव न छापल्याने शिवसेना (UBT) गटाने नाराजी व्यक्त केली आहे.
ग्रामपंचायत विकासकामांसाठी स्थानिक आमदारांची संमती आवश्यक असते. त्यामुळे या उद्घाटन सोहळ्यास आमदार जाधव यांचे नाव आणि उपस्थिती असायला हवी होती, असा सवाल UBT गटाने उपस्थित केला आहे. आपली नाराजी हि नियोजन कमिटी कडे केली आहे.
युवासेना (UBT) पदाधिकाऱ्यांनी गुहागर पंचायत समितीकडे लेखी स्वरूपात आपला निषेध नोंदवला असून, कार्यक्रमाचे नियोजन पक्षपातीपणे झाल्याचा आरोप केला आहे.
गावाच्या विकासावर परिणाम होणार?
स्थानिक राजकारणात ग्रामपंचायत निवडणुका प्रामुख्याने गावपातळीवरील गट आणि पॅनलच्या माध्यमातून लढवल्या जातात. मात्र, निवडणूक जिंकल्यानंतर काही पदाधिकारी राजकीय पक्षांचा आश्रय घेतात.
यामुळे अनेक वेळा विकासकामांचे श्रेय कोणाला मिळावे यावरून संघर्ष होतो आणि ग्रामस्थांना विकासकामांचा फटका बसतो.
या प्रकरणात स्थानिक आमदारांना निमंत्रण दिले गेले नाही, त्यामुळे भविष्यात ग्रामपंचायतीच्या विकास निधीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्घाटन सोहळ्याचा राजकीय प्रभाव….
या वादामुळे गावपातळीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, आगामी ग्रामपंचायत पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत याचा परिणाम दिसून येऊ शकतो.स्थानिक विकास निधी अथवा योजना यांना प्रशासकीय मंजुरी साठी कधी कधी आमदार व खासदार यांची मान्यता हवी असते. कार्यकर्ते म्हणून आम्ही सतत याचा पाठपुरावा करत असतो.असे शिवसेना UBT पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.
ग्रामपंचायत हे गावाच्या विकासासाठी महत्त्वाचे प्रशासनिक केंद्र असते. मात्र, राजकीय श्रेयवादाच्या वादामुळे स्थानिक पातळीवर पक्षीय राजकारणाला अधिक चालना मिळत आहे. यात सर्वसामान्य मतदार भरडाला जातो.
ग्रामपंचायतीच्या या नव्या इमारतीचा उद्घाटन सोहळा विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात करेल की स्थानिक राजकारणाचा आणखी एक वादग्रस्त मुद्दा ठरेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तर नाराज शिवसेना UBT आणि राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष यांचे पदाधिकारी पुढे काय भूमिका घेतील? हे ही पाहू!
वार्तांकन – सुजेंद्र सुर्वे

Author: Ratnagiri Vartahar
⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️