कोकणात यलो अलर्ट; ३० मार्चला पावसाची शक्यता

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोकणात यलो अलर्ट; ३० मार्चला पावसाची शक्यता

रत्नागिरी: कोकणातील हवामानात लक्षणीय बदल होत असून, भारतीय हवामान विभागाने ३० मार्च रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. केरळपासून महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार, कोकण किनारपट्टीवर मच्छीमारांनी आपल्या नौका सुरक्षित स्थळी नांगरून ठेवल्या आहेत.

आंबा-काजू बागायतदार चिंतेत

अवकाळी पावसाने कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांमध्ये चिंता वाढली आहे. हवामान बदलांचा या पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे आधीच झळ बसलेल्या बागायतदारांना आता अवकाळी पावसाचा धोका भेडसावत आहे.

समुद्रात वादळी वाऱ्याचा इशारा

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर २९ आणि ३० मार्च रोजी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. परिणामी, मिरकरवाडा, राजीवडा, मिऱ्या, साखरतर, कासारवेली, जयगड, नाटे, हर्णे येथील बहुतांश नौका किनाऱ्यावर परतल्या आहेत.

तापमानातील चढ-उतार

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत तापमान २ ते ३ अंश सेल्सियसने घटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ४२ ते ४४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून, विदर्भ आणि मराठवाड्यात ४० ते ४२ अंश सेल्सियस तापमान आहे. कोकणात दिवसा उष्णता जाणवत असून, संध्याकाळी वातावरण पावसाळी होत आहे.

नागरिकांनी घ्यावी खबरदारी

हवामान तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर बागायतदारांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना कराव्यात. तसेच, मच्छीमारांनी समुद्रात जाण्यापूर्वी हवामानाच्या अद्यतनांची माहिती घ्यावी.

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...