🟣 गुहागर तालुक्यात अतिवृष्टीचा कहर!
नरवण बाजारपेठेत पाणी-चिखलाचा विळखा…
भूमिगत केबल खोदकामामुळे रस्त्यावर माती व दगड
गुहागर (प्रतिनिधी) – तालुक्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने नरवण परिसराला अक्षरशः झोडपून काढले. विशेषतः नरवण बाजारपेठ व मुख्य रस्त्यावर चिखल, दगड आणि पाण्याने अडथळे निर्माण झाले. मागील काही महिन्यांत महावितरण आणि एअरटेल कंपनीने भूमिगत केबलसाठी खोदलेली साईडपट्टी या परिस्थितीस कारणीभूत ठरली आहे.
गुरुवारी जोरदार पावसानंतर रस्त्याच्या उतारावरून वाहत आलेली माती, खचलेले दगड आणि साचलेले पाणी यामुळे नरवण बाजारपेठेतील जनजीवन विस्कळीत झाले. काही वेळ वाहतूक बंद झाली. या भागातील काही घरांत चिखलपाणी घुसले. इतकेच नव्हे तर गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री व्याघ्रांबरी देवी मंदिरातही पाणी शिरल्याने ग्रामस्थ संतप्त झाले.
स्थानिक नागरिक प्रविण वेल्हाळ यांनी यासंदर्भात पत्रकारांना सांगितले की, “२२ मे रोजी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला सुचना देण्यात आली होती, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. परिणामी, साईडपट्टी वाहून गेली आणि चिखल-माती घरांमध्ये शिरले.”
नरवण ग्रामपंचायतीनेही मे महिन्यात गटार सफाईसाठी अधिकृत पत्र दिले होते. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने आज अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. सरपंच संतोष मोरे यांनी माहिती दिली की, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजनेतून बंधारा बांधण्यात आला असला तरी बाजारपेठेच्या बाजूने येणारे प्रवाह अडवण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.
ग्रामस्थांकडून यासंबंधी त्वरित उपाययोजना करण्याची जोरदार मागणी होत आहे. अन्यथा पुढील पावसाळ्यात परिस्थिती अधिक भयावह होण्याची भीती व्यक्त होत आहे.
—
🟢 #गुहागर_पाऊस #नरवण_पुरस्थिती #रत्नागिरी_वृत्त #ग्रामस्थांची_हाक #साईडपट्टी_खोदकाम #चिखलपाणी #व्याघ्रांबरी_मंदिर
—
📸 फोटो

Author: Sujit Surve
Sujit surve * Ratnagiri vartahar* Media creators