पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विधवा व एकल महिलांना ‘चविका चहा’ स्टॉलचे वाटप: रोजगाराची नवी पहाट!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विधवा व एकल महिलांना ‘चविका चहा’ स्टॉलचे वाटप: रोजगाराची नवी पहाट!

रत्नागिरीत १७ महिलांना मोफत टी स्टॉल; आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

Uday Samant
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विधवा व एकल महिलांना ‘चविका चहा’ स्टॉलचे वाटप: रोजगाराची नवी पहाट!

रत्नागिरी: विधवा आणि एकल महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी रक्षितम अग्रोनिक्स ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड आणि चक्रभेदी सोशल फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत, १२ जुलै २०२५ रोजी पालकमंत्री मा. उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी येथे ‘चविका चहा टी स्टॉल’ योजनेचे उद्घाटन करण्यात आले. या योजनेद्वारे प्राथमिक टप्प्यात सात गरजू महिलांना मोफत टी स्टॉलचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे त्यांना सन्मानाने रोजगार मिळवण्याची संधी प्राप्त झाली आहे.

फेब्रुवारी २०२५ पासून सुरू झालेल्या या योजनेसाठी विधवा व एकल महिलांकडून अर्ज मागवण्यात आले होते. प्राप्त २० अर्जांपैकी १७ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. चिपळूण, लांजा, संगमेश्वर आणि रत्नागिरी येथील व्यावसायिक जागांची प्रत्यक्ष पाहणी कंपनीचे अनुशील मेढे आणि संस्थेच्या वैदेही सावंत, आश्लेषा इंगवले यांनी केली होती.

रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील मा. बाळासाहेब ठाकरे सभागृहात आयोजित या उद्घाटन समारंभात, कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका मा. जयादेवी अनुशील मेढे आणि अंतप्रेरक मा. अनुशील मेढे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर फीत कापून स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.

माजी नगरसेविका आणि शिवसेना महिला जिल्हाप्रमुख मा. शिल्पा प्रशांत सुर्वे यांनी प्रास्ताविकात या योजनेचे कौतुक केले. अनुशील मेढे यांच्या सेवाभावी वृत्तीचे त्यांनी विशेष कौतुक केले आणि चक्रभेदी संस्थेच्या वैदेही सावंत यांनी दिलेल्या माहितीमुळेच आपण तत्परतेने एकल महिलांची नावे देऊ शकलो, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना कंपनीचे मा. अनुशील मेढे यांनी रत्नागिरीतील लाभार्थी महिलांनी व्यक्त केलेला विश्वास, “सामंत साहेब भावाप्रमाणे आमच्या पाठीशी आहेत,” याची आठवण करून दिली. तसेच, भविष्यात ५०० महिलांपर्यंत ‘आशा स्वयं सिद्धा’ योजना पोहोचवण्याचे आणि प्रत्येक महिलेने या माध्यमातून २५ ते ३० हजार रुपये कमवावे, असे आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री मा. उदय सामंत यांनी ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी असून ती अत्यंत स्तुत्य असल्याचे मत व्यक्त केले. रत्नागिरीत या योजनेस संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील लाभार्थींमध्ये शीतल शंकर सावंत (चिपळूण), दीपाली दिनकर गावडे (रत्नागिरी), रुचिता रविंद्र सुर्वे (रत्नागिरी), पूजा अंकुश सुर्वे (चिपळूण), दिपाली नरेंद्र विचारे (सावर्डा), समीक्षा गुरुनाथ सावंत (रत्नागिरी) आणि संपदा प्रमोद सावंत (रत्नागिरी) यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा. शिल्पा सुर्वे, सेवार्थ फाउंडेशन, मा. शशिकांत मोदी, परशुराम स्वयंरोजगार सहकारी संस्था, चक्रभेदी संस्थेचे सल्लागार मा. रावसाहेब चौगुले, आश्लेषा इंगवले, रागिणी यशवंतराव, प्रमोद पालवे यांनी मोलाचे सहकार्य केले. सूत्रसंचालन अभिजित गोडबोले यांनी केले, तर सुनील बेंडखळे यांनी संगमेश्वरी बोलीतील प्रहसन सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल चक्रभेदी संस्थेच्या वैदेही सावंत यांनी समाधान व्यक्त केले असून, अजूनही ज्या विधवा व एकल महिलांना टी स्टॉलची आवश्यकता आहे, त्यांनी संस्थेकडे अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

 

 

#चविकाचहाटिस्टॉल #पालकमंत्रीउदयसामंत #विधवाएकलमहिलेसाठीरोजगार #रत्नागिरीविकास #आर्थिकसक्षमीकरण #महिलासशक्तीकरण #चक्रभेदीसोशलफाउंडेशन #रक्षितमअग्रोनिक्स #स्वयंरोजगार #आशा

स्वयंसिद्धा

Ratnagiri Office
Author: Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...