पीडब्ल्यूडी ने दखल न घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाचा इशारा
भारती एअरटेलवर आरोप — साईट पट्टी खोदून रस्त्यांचे नुकसान; फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी
लांजा प्रतिनिधी (जितेंद्र चव्हाण) :
लांजा व राजापूर परिसरात भारती एअरटेल लिमिटेड पुणे या कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील रस्त्यांवर साईट पट्टी खोलवर खोदून केबल टाकल्याचा गंभीर आरोप झाला आहे. या कामामुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तक्रारीनुसार, कंपनीला केवळ 10% साईट पट्टी वापरण्याची अट होती, मात्र अटींचे उल्लंघन करून अनेक किलोमीटरपर्यंत खोदकाम करण्यात आले. तसेच रस्त्याची दुरुस्ती योग्य पद्धतीने करण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित कंपनीकडून प्रति मीटर 5 हजार रुपये दंड वसूल करण्यासोबतच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग लांजा यांनी 31 जुलै 2025 रोजी लांजा पोलीस ठाण्याला शासन मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत गुन्हा नोंदविण्याचे पत्र दिले. तरीही, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
माहिती अधिकार फेडरेशन रत्नागिरी जिल्हा सचिव पद्मनाथ कोठाळकर यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देत सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत —
- चुकीचा जॉईन सर्वे करून शासनाची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.
- अटींचे उल्लंघन करून केलेल्या अतिरिक्त खोदकामाबद्दल ₹5000 प्रति मीटर दंड वसूल करावा.
- कंपनीची परवानगी तात्काळ रद्द करून पुढील कोणत्याही जिल्ह्यातील रस्त्यांवर परवानगी देऊ नये.
कोठाळकर यांनी इशारा दिला आहे की, या प्रकरणात कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लक्षणीय उपोषण करण्यात येईल.
#भारतीएअरटेल #रत्नागिरी #लांजा #राजापूर #PWD #रस्तानुकसान #फौजदारीगुन्हा #RatnagiriNews #Maharashtra
📷 फोटो