विज्ञान रंजन स्पर्धेत आबलोलीच्या वैदेही रेपाळ हिचे यश.
गुहागर तालुक्यात पटकावला पाचवा क्रमांक
आबलोली (संदेश कदम)
रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ‘विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षा २०२५-२६’ मध्ये चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आबलोलीची विद्यार्थिनी कुमारी वैदेही अजित रेपाळ हिने घवघवीत यश संपादन केले आहे. वैदेहीने गट क्र. २ मधून सहभाग घेताना गुहागर तालुक्यात पाचवा क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ दरवर्षी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करते. या कठीण परीक्षेत वैदेहीने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत तालुक्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.
तिच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक डी . डी.गिरी, शिक्षक वृंद, लोकशिक्षण मंडळ आबलोली संस्थेचे कार्याध्यक्ष सचिनशेठ बाईत यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे. वैदेहीला मिळालेल्या या यशामुळे आबलोली परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भविष्यात विज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेण्याचा मानस वैदेही अजित रेपाळ हिने या निमित्ताने व्यक्त केला आहे.













