🔴 लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात हजारोंचा मोर्चा; पीफास रसायनामुळे संताप, कारखाना बंद करण्याची जोरदार मागणी
: ७६ दिवसांपासून सुरू धरणे आंदोलन; प्रशासनाच्या भूमिकेवर ग्रामस्थ नाराज, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
चिपळूण : लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज या कारखान्याविरोधात सोमवारी हजारो ग्रामस्थांनी भव्य मोर्चा काढत कारखाना तात्काळ बंद करण्याची मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाने आज उग्र रूप धारण केले.
कारखान्यात तयार होणारे पीफास (PFAS) रसायन पर्यावरण आणि मानवी आरोग्यास अत्यंत घातक असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी ‘पीफास हटाव, कोकण बचाव’ तसेच ‘लक्ष्मी ऑरगॅनिक बंद करा’ अशा जोरदार घोषणा दिल्या. या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
या मोर्चात कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांचा मोठा सहभाग होता. पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने आंदोलनाची तीव्रता स्पष्ट झाली.
दरम्यान, या मागणीसाठी गेल्या ७६ दिवसांपासून कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे आंदोलन सुरू असून, अशोक जाधव आणि राजेंद्र आंब्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाला जिल्हाभरातूनच नव्हे तर राज्यभरातून पाठिंबा मिळू लागला आहे.
प्रशासनाने अद्याप ठोस निर्णय न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रशासनाच्या सूचनेनुसार कारखान्यापासून काही अंतरावरच मोर्चा थांबवण्यात आला.
यावेळी आंदोलनाच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला निवेदन सादर करत कारखाना बंद करण्याची मागणी पुन्हा ठामपणे मांडली. तसेच, लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
> “कंपनीविरोधात सर्व शासकीय कार्यालयांशी पत्रव्यवहार केला आहे. प्रशासनाला काही दिवसांची मुदत दिली आहे. त्या कालावधीत कारखाना बंद झाला नाही तर आणखी मोठे आंदोलन उभारले जाईल.”
— रवी गोवळकर, ग्रामस्थ, लोटे














