मुंबईतील मृत्यूच्या घटनेचा कलिंगड विक्रीवर परिणाम; कल्याण APMC मध्ये 12 ट्रक माल पडून, शेतकरी-विक्रेते संकटात
ग्राहकांनी कलिंगड खरेदीकडे फिरवली पाठ; लाखोंचा माल खराब होण्याची भीती
मुंबईत घडलेल्या एका धक्कादायक मृत्यूच्या घटनेनंतर कलिंगड विक्रीवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र समोर आले आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) मध्ये तब्बल 10 ते 12 ट्रक कलिंगड विक्रीअभावी पडून आहेत. ग्राहकांनी अचानक कलिंगड खरेदीकडे पाठ फिरवल्याने शेतकरी आणि विक्रेते आर्थिक संकटात सापडले आहेत.
मुंबईतील घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मुंबईतील एका कुटुंबाने बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ले आणि त्यानंतर चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र अन्न व औषध प्रशासनाने या मृत्यूचा कलिंगडाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
बाजारात लाखोंचा माल पडून, खराब होण्याची शक्यता
उन्हाळ्यात कलिंगडाला मोठी मागणी असते. दररोज कोट्यवधी रुपयांच्या फळांची आवक होणाऱ्या कल्याण APMC बाजारात सध्या कलिंगड खरेदीत मोठी घट झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून ट्रकमध्ये पडून असलेला माल आता खराब होऊ लागला आहे. त्यामुळे विक्रेत्यांवर हा माल फेकून देण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
शेतकरी आणि ट्रक चालकांवर आर्थिक संकट
अहिल्यानगर, बीड, नाशिक आदी भागांतून कलिंगड घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. विक्री होत नसल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. तसेच ट्रक चालकांसमोरही वाहतूक खर्च, डिझेल खर्च आणि वाहनांचे हप्ते भरण्याचा प्रश्न उभा राहिला आहे.
प्रशासनाचा निर्वाळा, तरीही ग्राहकांची भीती कायम
अन्न व औषध प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले आहे की मुंबईतील मृत्यू कलिंगडामुळे झालेले नाहीत. वैद्यकीय तज्ज्ञांनीही नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सुरक्षित फळांचे सेवन करावे, असे आवाहन केले आहे. मात्र नागरिकांच्या मनातील भीती अद्याप कायम असल्याने त्याचा थेट फटका शेतकरी आणि विक्रेत्यांना बसत आहे.
















