सांगली हादरली! येरळा नदीत पोहायला गेलेल्या 8 जणांचा जीव धोक्यात; युवतीचा दुर्दैवी मृत्यू
भाळवणी येथे लग्नसमारंभादरम्यान दुर्घटना; वडिलांना वाचवताना 20 वर्षीय फिरदोस शिकलगारचा मृत्यू
सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली असून येरळा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 8 जणांचा जीव धोक्यात आला. यामध्ये सर्वांना वाचवण्यात यश आले, मात्र वडिलांना वाचवण्यासाठी नदीत उडी घेतलेल्या एका 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत युवतीचे नाव फिरदोस जाकीर शिकलगार असे असून ती मूळची कोरेगाव येथील रहिवासी होती. सध्या ती मुंबई येथे वास्तव्यास होती.
लग्नसमारंभासाठी आले होते पाहुणे
खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील शिकलगार मळा परिसरात लग्न समारंभानिमित्त मुंबईसह इतर ठिकाणांहून अनेक पाहुणे आले होते. मंगल कार्यालयात कार्यक्रम सुरू असताना काही मुले आणि तरुण नदीत पोहण्यासाठी गेले होते.
यामध्ये 8 ते 10 लहान मुले व मुलींसह काही मोठी माणसेही होती. मुले पाण्यात खेळत असताना त्यांचे पालक नदीकाठी उभे होते. मात्र अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने काही मुले खोल पाण्यात गेली.
वाचवण्यासाठी गेलेलेही बुडाले
मुले बुडताना पाहून इतर काही जण त्यांना वाचवण्यासाठी धावले. या गोंधळात सात ते आठ जण नदीत बुडाले. घटनास्थळी असलेल्या पालकांनी आणि नागरिकांनी नदीत उडी घेत सर्वांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
या प्रयत्नात सात जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
वडिलांना वाचवताना मुलीचा मृत्यू
दरम्यान, काही पालकांनाही पोहता येत नसताना ते मुलांना वाचवण्यासाठी नदीत उतरले होते. त्यावेळी आपले वडील पाण्यात अडकल्याचे पाहून फिरदोस शिकलगार हिने त्यांना वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली.
मात्र दुर्दैवाने वडिलांना वाचवण्याऐवजी ती स्वतःच पाण्यात बुडाली. तिला तातडीने बाहेर काढून विटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
परिसरात हळहळ व्यक्त
या दुर्घटनेत काही मुले गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. फिरदोसच्या मृत्यूमुळे भाळवणीसह कोरेगाव आणि मुंबईतील नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे. या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
टिप – वरील प्रतिमा Ai निर्मित आहे. बातमी साठी फक्त
















