चिपळूण: कोकणात लोककलांची खाण आहे. याच कोकणातल्या लोककला नव्या पिढीपर्यंत किती पोहोचल्या आहेत, त्यांनी किती समजून घेतल्या आहेत, या प्रमुख उद्देशाने बाल रंगभूमी परिषद मुंबईच्यावतीने जल्लोष लोककलेचा हा लोककलांवर आधारित स्पर्धात्मक कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. लोककला नव्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात, त्यांनी त्या जपाव्यात, अशी या मागची भावना आहे, असे प्रतिपादन बालरंगभूमी परिषद मुंबईच्या अध्यक्षा, अभिनेत्री निलम शिर्के-सामंत यांनी केले.
चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस बालरंगभूमी परिषद मुंबईच्यावतीने व रत्नागिरी शाखेच्या संयोजनाने, नाट्य परिषद चिपळूणच्या सहकार्याने जल्लोष लोककला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून निलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते या महोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले.















