समर्थकांच्या जल्लोषात भास्करराव जाधव यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

समर्थकांच्या जल्लोषात भास्करराव जाधव यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल..

जनतेचा आणि माझा एकमेकांवरील विश्वास सार्थ ठरतोय – आम. भास्करशेठ जाधव

आबलोली (संदेश कदम) …

गेली अनेक वर्षे मी आमदार आहे. तरी माझ्यात कधी बदल झाला नाही. माझे पाय जमिनीवर राहीले आहेत. मला अहंकार गर्व नाही. इथल्या जनतेचा आणि माझा एकमेकांवरील विश्वास सार्थ ठरतोय असे स्पष्ट प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि गुहागरचे विद्यमान आमदार भास्करशेठ जाधव यांनी केले. यावेळी आमदार भास्करशेठ जाधव यांनी माजी आमदार डॉ. विनय नातू आणि माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांचेवरहि सडकून टिका केली

उमेदवारी अर्ज भरण्याआधी आम. भास्करशेठ जाधव यांनी गुहागर शहरात घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. भाजपाने २५ वर्ष मित्र असलेल्या शिवसेनेत फूट पाडली राष्ट्रवादी फोडली. मात्र टायगर अभी जिंदा है / हे लोकसभेत महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले आता विधानसभेच्या निवडणुकीतून इसबार महायुती तडीपार हे दाखवून देण्याची गरज आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात माझ्या समोर विरोधकच नाहित. गेले काही महिने शिवसेना गद्दार असल्याची खोटी पत्रके डॉ. विनय नातू वाटत आहेत. खोट्याचे खरे करणा-या भाजपवाल्यांनी अनेकवेळा हिंदुत्वाशी आणि २०१९ मध्ये शिवसेनेशी गद्दारी केली. हिंदुत्व बाजूला ठेवून मुप्ती महमंद सईद यांच्याशी सत्तेसाठी युती केली.

माझ्या कुटुंबावर गलिच्छ भाषेत टिका करताना हसणारे विनय नातू आता साड्या वाटत फिरत आहेत. माझ्यावर टिका करण्यासाठी सद्या त्यांनी निळूभाऊंना नियुक्त केले आहे. विपुल कदम ९ कार्यालयांचे उदघाटन करुन गेले मात्र आता त्यांना त्यांचे लोकच शोधत आहेत. त्यांना खिंडीत येऊ द्या मग त्यांना हिसका दाखवतो सद्या राजेश बेंडल यांचे नाव चर्चेत आहे. मात्र हा माणूस सकाळी लवकर उठत नाही आणि रात्री घरी कामे भरपूर असल्याने गायब होतो हे मी स्वतः २००९ च्या निवडणुकीत अनुभवले आहे. राजेश बेंडल यांना स्वत:ला वडिलांचे नावाने वसतीगृह बांधता आले नाही. फसवून नगरपंचायत घेतली पण समस्या सोडवू शकले नाहीत. तो काय समाजाचा विकास करणार इथल्या बहूसंख्य कुणबी समाजाचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या बेटकरांनाही कुणबी समाजाची मते मिळाली नव्हती. या समाजाचा शिवसेनेवर, माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. लोकसभेत कुणबी समाजाचे नाव घेणारे राजेश बेंडल, रामचंद्र हुमणे गुरुजी यांनी अनंत गीते उमेदवार असूनही सुनिल तटकरेंचे काम केले होते. तेव्हा यांचेवर समाज विश्वास ठेवणार नाही तरीही आपण सावध राहिले पाहिजे वर्षानुवर्षे धनुष्यबाणासमोरील बटण दाबणा-या जनतेला आपली निवडणूक चिन्ह यावर्षी मशाल हे समजावून सांगा. तुमच्या प्रत्येक अडचणीत सोबत असणारा, तुमच्या समस्या विधानसभेत मांडणारा आमदार म्हणून मला निवडून द्या. असे आवाहन ही भास्करशेठ जाधव यांनी केले

या सभेला शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन शेठ बाईत,तालुका सचिव विलास गुरव,जिल्हा प्रमुख सचिन कदम, जि. प. चे माजी सभापती महेश नाटेकर, जिल्हा महिला संघटक अरुणा आंब्रे, कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष साबीर साल्हे,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष पद्माकर आरेकर,आरपीआयचे सुभाष मोहिते, माजी नगराध्यक्ष स्नेहा वरंडे,स्नेहा भागडे,नेत्रा ठाकुर, जयदेव मोरे, माजी सभापती वृषाली वैद्य, पूर्वी निमूणकर, विलास वाघे, दत्ताराम निकम, राजू साळवी, शरद साळवी आदी. पदाधिकारी उपस्थित होते.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

Leave a Comment

आणखी वाचा...