कोकणचा पहाडी आवाज हरपला; ज्येष्ठ शाहीर रामचंद्र हरी घाणेकर (बुवा) यांचे निधन

नवीमुंबई (मंगेश जाधव)
शक्ती-तुरा शाहीरी परंपरेचे खंदे शिलेदार, रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ शाहीर रामचंद्र हरी घाणेकर (बुवा) यांचे सोमवारी (२१ जुलै २०२६) राहत्या घरी पडवण येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शक्ती-तुरा शाहीरी क्षेत्रावर शोककळा पसरली असून, कोकणच्या लोककलेचा एक दमदार आणि पहाडी आवाज कायमचा हरपला आहे.
शक्ती-तुरा शाहीरी परंपरा जपण्यात घाणेकर बुवा यांचे मोठे योगदान होते. आपल्या दमदार आवाजाने, प्रभावी सादरीकरणाने आणि लोककलेप्रती असलेल्या निष्ठेमुळे त्यांनी रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांना ‘रायगड भूषण’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.
शाहीरी क्षेत्रातील एक महान तारा आज अस्ताला गेल्याची भावना त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने शक्ती-तुरा परंपरेची कधीही भरून न निघणारी हानी झाल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटत आहे.
त्यांच्यावर आज दुपारी २ वाजता त्यांच्या मूळ गावी पडवण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, असंख्य चाहते आणि शाहीरी क्षेत्रातील सहकारी असा मोठा परिवार आहे.
ज्येष्ठ शाहीर रामचंद्र हरी घाणेकर (बुवा) यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतून हळहळ व्यक्त होत आहे












