मुंबई–सावंतवाडी रेल्वेच्या फाटलेल्या सीट्सवर कोकणवासीयांचा प्रवास; सुविधांबाबत रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष
तिकीट पूर्ण, मग सुविधा अपुऱ्या का? स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचा आंदोलनाचा इशारा
–मुंबई:- मंगेश जाधव कडून
मुंबई–सावंतवाडी रेल्वे मार्ग हा कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. रोजगारासाठी मुंबईत राहणारा नागरिक असो, विद्यार्थी असो किंवा ज्येष्ठ नागरिक—गावाशी जोडणारी ही रेल्वे कोकणाची जीवनवाहिनी आहे. मात्र, याच मार्गावरील गाड्यांमध्ये प्रवाशांना फाटलेल्या, जीर्ण आणि खराब झालेल्या सीट्सवर प्रवास करावा लागत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. प्रवाशांकडून तिकीटाचे पूर्ण भाडे वसूल करूनही अपुऱ्या सुविधा दिल्या जात असल्याने रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
हा केवळ असुविधेचा विषय नसून प्रवाशांच्या सन्मानाचा प्रश्न आहे, अशी टीका स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी केली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासात जीर्ण आसनव्यवस्थेमुळे महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. “कोकणवासीयांनी तिकीटाचे पैसे दिले आहेत, त्यांनी प्रशासनाकडे उपकार मागितलेले नाहीत. मग सुविधा देताना हात आखडता का घेतला जातो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रमुख मागण्या:
* मुंबई–सावंतवाडी मार्गावरील सर्व डब्यांची तातडीने तपासणी करून फाटलेल्या सीट्स त्वरित बदलण्यात याव्यात.
* डब्यांची नियमित स्वच्छता आणि देखभाल सुनिश्चित करावी.
* खराब आसनव्यवस्थेबाबत प्रवाशांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र नोंद व निवारण यंत्रणा उभारावी.
* प्रवाशांकडून वसूल केलेल्या भाड्याच्या तुलनेत दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
प्रशासनाने तातडीने संबंधित गाड्यांची पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास, स्वतंत्र कोकणराज्य अभियानाच्या वतीने लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभारण्यात येईल, असा थेट इशारा संजय कोकरे यांनी दिला आहे. कोकणवासीय शांत आहेत, पण गप्प बसणार नाहीत; त्यामुळे प्रशासनाने या समस्येवर तातडीने सार्वजनिक उत्तर देऊन प्रश्न मार्गी लावावा, अशी जोरदार मागणी आता जोर धरू
लागली आहे.










