NEET पेपरफुटी प्रकरण : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुंबईत ठाकरे बंधूंचा सरकारवर हल्लाबोल; “अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले”

NEET पेपरफुटी प्रकरण : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुंबईत ठाकरे बंधूंचा सरकारवर हल्लाबोल; “अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले”

विद्यार्थी आंदोलनाला यश मिळाल्याचा दावा; राज ठाकरे यांची आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली, उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारवर जोरदार टीका

मुंबई :
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरण आणि तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरात उभ्या राहिलेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरे बंधूंनी आयोजित केलेल्या तिरंगा मोर्चाचे विजयी सभेत रूपांतर झाले. या सभेला विद्यार्थी, तरुणाई आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्गदर्शन करत केंद्र सरकारवर टीका केली.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात हा दिवस भाषणाचा नसून विद्यार्थी आंदोलनाच्या यशाचा उत्सव असल्याचे सांगितले. देशातील ‘Gen Z’ तरुणांनी एकजूट दाखवत सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडल्याचे त्यांनी म्हटले. तसेच नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे निराश होऊन आत्महत्या केलेल्या २१ विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या नावांचे वाचन केले.

उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले असून आता भाजपविरुद्ध भारत असा संघर्ष सुरू झाला आहे,” असे ते म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षांतर आणि राजकारणापेक्षा देशाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

महागाई, घसरता रुपया, पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवरून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “मत चोरता येतील, पण लोकांची मने चोरता येत नाहीत,” असे सांगत त्यांनी तरुणांनी निर्माण केलेली जनजागृती कायम ठेवण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांना धमक्या देणाऱ्यांविरोधात आवाज उठवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

सभेच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी तरुणाईचे कौतुक करत, “तुम्ही देशाच्या इतिहासात सुवर्णपान लिहिले आहे. ही जागरूकता कायम ठेवा,” असे आवाहन केले.

टीप: या वृत्तातील राजकीय नेत्यांची विधाने त्यांच्या सभेतील भाषणांवर आधारित असून ती संबंधित नेत्यांची मते आहेत.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें