जलपर्यटन वाढीसाठी सुविधा विकसित करणार – मंत्री नितेश राणे
मुंबई – महाराष्ट्र सागरी मंडळाअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण करावे, मत्स्य व्यवसायासाठी बंदरांचा विकास करावा आणि जलपर्यटनाला चालना देण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण कराव्यात, अशा स्पष्ट सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.
मंत्रालयात झालेल्या सागरी मंडळाच्या आढावा बैठकीत मंत्री राणे यांनी विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रेडिओ क्लब येथे प्रवासी जेट्टी व टर्मिनल इमारतीच्या उभारणीसाठी आवश्यक जागा निश्चित करण्याचे निर्देश दिले. तसेच राष्ट्रीय जलमार्ग ५३ अंतर्गत डोंबिवली येथे सुरू असलेल्या जेट्टीच्या बांधकामाला गती देण्याचे आदेश दिले.
जलपर्यटन वाढीसाठी सागरी महामार्गालगतच्या व्यवसायांमधून मिळणारा महसूल जेट्टींच्या देखभाल-दुरुस्तीसाठी तसेच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वापरण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीत रत्नागिरीच्या साखरीनाटे मत्स्यबंदाराचा विकास, रायगडमधील दिघी जेट्टीचा विस्तार व त्यावर लिंकस्पॅन व पांटून बसविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. तसेच वेंगुर्ला येथे पर्यटनासाठी पाईल जेट्टी, काशिद येथे रो-रो सेवेसाठी तरंगती जेट्टी आणि देवबाग येथील कर्ली नदीच्या तटसंरक्षणाच्या प्रकल्पावरही सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीला विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष सुशील कुमार सिंह, जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीचे अध्यक्ष उमेश वाघ तसेच भारतीय नौसेनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.