परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी गुढी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सरकारला इशारा

परभणी : महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचे आवाहन केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या भूमिकेचा निषेध नोंदवण्यासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी गुढी उभारून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात कांद्याचा आणि कापसाचा हार घालून प्रतीकात्मक निषेध करण्यात आला.
या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचा निषेध केला. सरकारने तातडीने कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी जोरदार मागणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकरी आक्रमक झाल्याने सरकारवरील दबाव वाढला आहे.
अजित पवारांचे वक्तव्य आणि शेतकऱ्यांचा रोष
अजित पवार यांनी बारामती येथे आयोजित मेळाव्यात कर्जमाफीबाबत भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “आर्थिक शिस्त पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे या वर्षी आणि पुढच्या वर्षी पीक कर्जमाफी देण्याची परिस्थिती नाही.” तसेच, “सगळी सोंग करता येतात, पण पैशाचे सोंग करता येत नाही,” असे सांगत त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीचा दाखला दिला. मात्र, त्यांच्या या वक्तव्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत, खासगी, ग्रामीण आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत शेतीसाठी कर्ज दिले जाते. अनेक शेतकऱ्यांनी सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवून कर्ज भरण्यासाठी विलंब केला होता. मात्र, सरकारने कर्जमाफीबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकरी अस्वस्थ असून, त्याचा संताप आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी अन्यथा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.