भीषण अपघात: मुंबईहून देवरुखला येणारी कार खेडजवळ 100 फूट खोल कोसळली; पाच जणांचा जागीच मृत्यू
अंत्यविधीसाठी निघालेली कार काळाच्या घशात; चालकासह एक जखमी
रत्नागिरी | खेड
मुंबईहून देवरुखकडे अंत्यविधीसाठी निघालेली एक कार खेडजवळील जगबुडी नदी पुलावरून थेट 100 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून चालक आणि एक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत.
अपघात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सोमवार (19 मे) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडला. भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती पुलावरून थेट 100 ते 150 फूट खाली कोसळली. जोरदार धडकेत कारचा अक्षरश: चुराडा झाला. क्रेनच्या साहाय्याने कार वर काढण्यात आली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले.
कारमधील सर्व प्रवासी मुंबईहून देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात होते. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याची हृदयद्रावक घटना घडली. अपघातानंतर घटनास्थळी पोलीस आणि आपत्कालीन सेवा तातडीने दाखल झाली. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
#खेडअपघात #मुंबईगोवा #देवरुख #RatnagiriNews #भीषणअपघात #जगबुडीपूल
बातमी – मंगेश जाधव.















