पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर; २ लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पात घोषणा; संपूर्ण कर्जमाफी नाही, ‘या’ अटीमुळे अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकित असलेल्या पीककर्जावर दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करत आहेत त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर यासाठी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली होती. मात्र अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या निर्णयानुसार संपूर्ण कर्जमाफीऐवजी फक्त दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी लागू करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील बँकिंग व्यवस्था मजबूत राहावी आणि शेतकरी पुन्हा कर्जाच्या जाळ्यात अडकू नयेत यासाठी समितीच्या शिफारसीनुसार पुढील निर्णय घेतले जातील. शेतकऱ्यांना दीर्घकालीन दिलासा देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या घोषणेनंतरही संपूर्ण कर्जमाफीची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दोन लाखांची मर्यादा आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकबाकी असण्याची अट यामुळे अनेक शेतकरी या योजनेबाहेर राहण्याची शक्यता आहे.
विरोधकांकडून टीका वाढणार
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर विरोधकांनी सातत्याने शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला होता. निवडणुकीत दिलेले संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन सरकारने पाळले नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकरी संघटना आणि विरोधकांकडून आंदोलनाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारच्या या घोषणेमुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी संपूर्ण कर्जमाफीची मागणी मात्र अजूनही कायम असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे.













