साटवलीच्या मोकाट गुरांचा सडवलीत धुमाकूळ; पाणी उपसून जगवलेली भातशेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची मागणी
पावसाअभावी कष्टाने जगवलेल्या भातपिकाची तुडवणूक; वासुदेव डांगे, शांताराम जुवळे व सुवास रांबाडे यांचे मोठे नुकसान, संबंधित पशुपालकांवर कारवाईची मागणी
लांजा प्रतिनिधी : जितेंद्र चव्हाण
यंदा पावसाने दडी मारल्याने आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता मोकाट गुरांचा नवीन प्रश्न उभा ठाकला आहे. साटवली गावातील तालयवाडी येथून आलेल्या मोकाट जनावरांनी सडवली येथील ‘शेंब्याची तळी वडाजवळ’ असलेल्या भातशेतीत घुसून उभ्या पिकाची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. या घटनेमुळे पाणी उपसून कष्टाने जगवलेले भातपीक अक्षरशः उद्ध्वस्त झाले असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
यंदा कमी पावसामुळे सडवली परिसरातील भातशेती कोमेजू लागली होती. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी विहिरीवरून मोटारद्वारे पाणी उपसून, डिझेल व वीजेचा अतिरिक्त खर्च करत मोठ्या मेहनतीने भातपिके जिवंत ठेवली. मात्र, सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास साटवली तालयवाडी येथील ७ ते ८ मोकाट जनावरे शेतात घुसली आणि उभ्या पिकाची तुडवणूक करत संपूर्ण शेतीची नागदूस केली.

या घटनेत स्थानिक शेतकरी वासुदेव डांगे, शांताराम जुवळे आणि सुवास रांबाडे यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. डोळ्यांदेखत उभे पीक नष्ट झाल्याने संबंधित शेतकऱ्यांसह संपूर्ण सडवली गावातून संताप व्यक्त केला जात आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले की, “पावसाअभावी आम्ही मोटार लावून पाणी उपसत पिके जगवली. मात्र सकाळी मोकाट गुरांनी शेतात घुसून सर्व मेहनत वाया घालवली. आमच्या कष्टावर पाणी फिरले असून संबंधित गुरांच्या मालकांवर कठोर कारवाई करून आम्हाला तातडीने नुकसानभरपाई द्यावी.”
या घटनेमुळे साटवलीतील संबंधित पशुपालकांच्या बेजबाबदारपणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, स्थानिक प्रशासन, पोलीस आणि दोन्ही गावांच्या ग्रामपंचायतींनी तातडीने हस्तक्षेप करून मोकाट गुरांवर नियंत्रण आणावे, संबंधित मालकांवर दंडात्मक कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
SEO Keywords:
साटवली मोकाट गुरे, सडवली भातशेती नुकसान, लांजा बातमी, Ratnagiri News, भातशेती उद्ध्वस्त, शेतकरी नुकसानभरपाई, मोकाट जनावरे, कोकण शेती, Ratnagiri Vartahar.













