आषाढी एकादशीनिमित्त कोळवली भुवडवाडी शाळेत साक्षरता वारी; नवसाक्षरांना शिक्षणाचा प्रेरणादायी संदेश
उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; नवसाक्षरांना परीक्षेबाबत मार्गदर्शन
गुहागर- तालुक्यातील केंद्र भातगाव अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोळवली भुवडवाडी येथे आषाढी एकादशीनिमित्त उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत साक्षरता वारीचे आयोजन करण्यात आले. या वारीत शाळेतील विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच गावातील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
गणेश मंदिर व दत्त मंदिर येथून प्रारंभ झालेल्या साक्षरता वारीत विठुरायाच्या नामगजरासह साक्षरतेचा संदेश देणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. नवसाक्षरांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत ही वारी पायी शाळेत दाखल झाली. शाळेत आगमनानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘माऊली… माऊली’ या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.
यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. रविंद्र कुळये यांनी साक्षरतेचे महत्त्व विशद करत नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेबाबत नवसाक्षर महिला व पुरुषांना मार्गदर्शन केले. उपस्थित नवसाक्षरांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत साक्षरता वारीत सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमास स्थानिक कार्यकर्ते संदीप शंकर ठोंबरे, संदीप जानू डिंगणकर, ग्रामपंचायत कर्मचारी अभिषेक चंद्रशेखर लिंगायत, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा खुशी सचिन हुमणे तसेच समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. रविंद्र कुळये व शिक्षक श्री. सतीश विचारे यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.










